पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत पाण्याच्या टाकीत पडून एका २० महिन्याच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी (ता. २३) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.
हर्ष सागर जगताप (वय २० महिने, रा.आश्रम रोड, उरुळी कांचन, ता.हवेली) असं टाकीत पडून बुडून मृत्यू झालेल्या बाळाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील आश्रम रोड परिसरात एका सदनिकेचे काम सुरु आहे. त्या सदनिकेला पाणी मारण्यासाठी त्या ठिकाणी एक पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. तसेच त्या ठिकाणी एक सुरक्षारक्षकाची नेमणूक देखील करण्यात आली आहे. सदनिकेचे काम सुरु असून त्या ठिकाणी लहान मुले दररोज खेळत असतात. मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हर्ष हा खेळता खेळता पाण्यात पाण्याच्या टाकीत पडला होता. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हर्ष कुठे दिसून न आल्याने त्याची शोधाशोध सुरु केली. यावेळी पाण्याच्या टाकीत सागरचा मृतदेह आढळून आला.