पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांना राज्यपाल या पदावरून हटवण्याची मागणी जोर धरते आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन कोश्यारी यांच्या वक्तव्यांबाबत संताप व्यक्त केला आहे. यावेळी ते म्हणाले कि, राज्यपाल जेव्हा बोलले तेव्हा तिथे मी आणि नितीन गडकरी होतो. त्यांनी तो उल्लेख केला. तो माझ्याबद्दल नव्हता. गडकरींबद्दल होता, असं शरद पवार म्हणाले.
अनेक गोष्टींवर वादग्रस्त विधाने करणं हे या राज्यपालांचं वैशिष्ट्ये आहे. आणि तसा त्यांचा लौकीक आहे. चुकीची विधानं करणं, समाजात गैरसमज कसा माजेल याची खबरदारी घेणं असं त्यांचं मिशन आहे की काय ही शंका येते, अशी शंका पवारांनी उपस्थित केली. फुले दाम्पत्यांबद्दलचा उल्लेख आणि शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी वादग्रस्त उल्लेख केला आहे. या पदावर असणाऱ्या व्यक्तीने जबाबदारीने भूमिका घ्यायची असते, याचं स्मरण नसलेली व्यक्ती महाराष्ट्रात पाठवली आहे, असा टोला त्यांनी लगावला.
राज्यपाल ही संस्था आहे. या संस्थेची प्रतिष्ठा ठेवायची म्हणून मी यापूर्वी जास्त बोललो नाही. पण शिवाजी महाराजाांवर विधान करून त्यांनी सर्व मर्यादा सोडल्या आहेत. काल त्यांनी शिवाजी महाराजांचं कौतुक केलं. पण राज्यातून उमटलेल्या प्रतिक्रियेनंतर त्यांना उशिरा सूचलेलं शहाणपण होतं.