‘पंतप्रधान मोदी यांच्यासोबत या दोन मुद्द्यांवर झाली चर्चा’, शरद पवार यांचा खुलासा

200 0

नवी दिल्ली – शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीबाबत संपूर्ण देशामध्ये कुतूहल निर्माण झाले होते. नेमकी काय चर्चा झाली याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया येत असतानाच खुद्द शरद पवार यांनी या भेटीमागील उद्देश सांगितला.

भाजपचा आज पक्ष स्थापन दिवस आहे. त्यामुळे सकाळपासून पंतप्रधान मोदी कार्यक्रमात व्यस्त होते. याच व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांना भेट दिली. या दोन नेत्यांच्या भेटीत काय चर्चा झाली याचा तपशील शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितला.

महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती अद्यापही प्रलंबित आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाली. तसेच राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडला.

शरद पवार म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राचे राज्यपाल नियमाला धरुन काम करत नाहीत. विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचाही प्रश्न त्यांनी प्रलंबित ठेवला आहे. राज्यपालांकडून अडवणूक होत असल्याचे पवारांनी मोदींना सांगितले. त्यावर पंतप्रधानांनी या मुद्द्यावर लक्ष देण्याचं आश्वासन दिल्याचे पवार म्हणाले. राज्यसभा खासदार संजय राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईची तक्रार मोदींकडे केल्याचे पवार यांनी सांगितले. संजय राऊत राज्यसभा सदस्य आहेत आणि ते एक पत्रकार आहेत, याबाबत मी मोदींना कल्पना दिली आहे. राऊतांवर अन्याय झालाय, ही कल्पना मोदींना दिला आहे, असेही त्यांनी सांगितले. या दोन विषयांवर मोदी नक्की विचार करतील आणि ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे, असे पवार म्हणाले.

हे सरकार पाच वर्षे पूर्ण करून पुन्हा सत्तेत येणार

ईडीने संजय राऊत आणि इतर नेत्यांवर कारवाई केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला धोका आहे का या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, “राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे स्थिर आहे, हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल आणि पुढच्या निवडणुकीनंतर पुन्हा सत्तेत येणार”

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!