महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राज्याच्या गृह खात्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. महिला प्रतिनिधीला स्वतःवरती झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इतके वेळ पोलीस स्टेशनला बसवावं लागतं, त्यांची तक्रार घेतली गेली नाही म्हणून त्यांना आयोगाला तक्रार करावी लागली हे दुर्दैवाची गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलंय. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबतीत त्यांनी वरील विधान केलं आहे.
रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की, एखादी महिला तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आली तर तिची तक्रार ऐकून घेतली जात नाही. दिवसेंदिवस जाहीर सभांमधून एखाद्या महिलेवर टीका करताना अतिशय पातळी सोडून भाषा वापरण्याचं प्रमाण वाढलेय. यासंदर्भात महिलांच्या तक्रारी आल्यानंतर त्याची दखल घेऊन तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना देत असल्याच त्यांनी सांगितलं.
विदेशात नोकरीचे आमिष दाखवून राज्यातील अडीच हजार महिलांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यात पुणे शहरातील अनेक महिला असल्याची धक्कादायक माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. कामाच्या आमिषाने या महिलांना दुबईमध्ये नेण्यात आले. ज्यानंतर त्यांचे कागदपत्र काढून घेतल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी त्यांनी गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष घालण्याचे आवाहन केलेय. यासंदर्भात केंद्र सरकारची मदत घेऊन या महिलांची सुटका करावी, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे.