आपला महाराष्ट्रठळक बातम्या

एप्रिल महिन्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट या जिल्ह्यात पडणार पाऊस

मार्च महिन्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु असतानाच आता पुन्हा अवकाळी पावसाचे ढग दाटून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भातील ट्विट ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी केले आहे.

मेच्या अखेरीस अवकाळी पाऊस पडतो. पण यंदा मार्चमध्येच पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर पुन्हा एप्रिल महिन्यात काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

४ ते ७ एप्रिल दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये ६ आणि ७ एप्रिल रोजी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानंतर मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्येही ६ आणि ७ एप्रिल दरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूरमध्ये ४ आणि ५ एप्रिल रोजी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पडतोय अवकाळी पाऊस

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मार्च महिन्यात पाऊस झाला होता असे हवामान विभागाचे मत आहे. मार्च महिन्यात आतापर्यंत चार वेस्टर्न डिस्टर्बन्सने उत्तर पश्चिम भारतातील मैदानी परिसरांना प्रभावित केलं आहे. एप्रिल महिन्यात हिच परिस्थिती राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.