नाशिक : नाशिक येथे शनिवारी पहाटे घडलेल्या भीषण अपघातानं अवघा महाराष्ट्र हादरला. चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला लागलेल्या आगीत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला.
तर 38 प्रवासी जखमी झाले. औरंगाबाद-नाशिक मार्गावरील नांदूर नाका इथल्या हॉटेल मिरची चौकात पहाटे 04 वाजून 20 मिनिटांनी ही दुर्घटना घडली.
या अपघाताबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, चिंतामणी ट्रॅव्हल्सची स्लिपर-कोच बस यवतमाळहून मुंबईला निघाली होती. स्लीपर कोच बस होती. त्या दरम्यान धुळ्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या एका ट्रेलरनं बसला धडक दिली.
या अपघातानंतर बसनं अचानक पेट घेतला. अपघाता दरम्यान बहुतांश प्रवासी झोपेत असल्यानं त्यांना सावरता आलं नाही. त्यामुळं बसला लागलेल्या आगीत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 38 प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
या अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.