पुणे शहर आणि जिल्ह्याच्या पाणी प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
पुणे शहर आणि जिल्ह्याच्या पाणी प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेला आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे शहराचा पाणीप्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
पुणे शहरातील पाणीटंचाईसंदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नव्हती. यामुळेच यासंदर्भात २०१६-१७ मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.
पाण्याच्या प्रश्नांवर विशेष समिती स्थापन करण्याचा आदेश न्यायालयाने पुणे मनपा, पिंपरी चिंचवड मनपा आणि पुणे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला दिला आहे. या समितीमध्ये पाणी प्रश्नी नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दोन्ही महानगरपालिकांनी विशेष समितीची फेररचना करावी, समितीमध्ये मनपा आयुक्त, विभागीय आयुक्त, मुख्य शहर अभियंता, जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव आणि पाणीपुरवठा संबंधित लोकांचा समावेश करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. या आदेशामुळे पुणे शहर व जिल्ह्यातील पाणी प्रश्न सुटण्यासाठी मदत होणार आहे.
