Mpsc मुख्य परीक्षेच्या निकालासंदर्भात महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीतर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात पुणे केंद्राने बाजी मारली आहे.
एकूण 1 हजार 279 विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. त्यातील पुणे केंद्रातून एकूण 903 उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. त्यापाठोपाठ औरंगाबाद केंद्रातून 113, नागपूर केंद्रातून 87, नाशिकमधून 77 मुंबई 75 तर अमरावती केंद्रातून एकूण 24 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. दिनांक 7 मे ते 9 मे या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्य सेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. तिचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
परीक्षेच्या निकालासह पात्रतागुणही आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहेत. या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी अपात्र ठरले आहेत, त्यांना जर आपल्या गुणाची पडताळणी करायची असेल तर त्यांनी दहा दिवसांच्या आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे असं देखील आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम स्वातंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोग वतीने सांगण्यात आलं आहे.