आपला महाराष्ट्रठळक बातम्या

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाला हिसंक वळण; यवतमाळमध्ये बस पेटवली

यवतमाळ : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. या उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आहे पण त्यांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. सरकारला दिलेला 40 दिवसांचा वेळ संपल्यानंतर त्यांनी हे उपोषण सुरू केलं आहे. यादरम्यान मनोज जरांगे यांनी मराठा समाजाने उद्रेक करू नये असं आवाहनही केले आहे. मात्र तरीदेखील काही ठिकाणी मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यवतमाळमध्ये मराठा आरक्षणासाठी बस पेटवून हा आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
उमरखेड तालुक्यात मारले गाव या ठिकाणी बस पेटवण्यात आली. मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी ही बस पेटवल्याचं सांगण्यात येत आहे. नांदेडहून नागपूरच्या दिशेने जाणारी ही बस अज्ञातांनी पेटवून दिली. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. या बसमधून सुमारे 40 ते 50 प्रवासी प्रवास करत होते. यावर आता सरकार काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.