नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपुरात दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या विस्तारासाठी स्थानिक नेत्यांशी करण्यासाठी आज राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर आहेत. या वेळी राज ठाकरे म्हणाले कि, “आज नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पत्र देण्यासाठी नागपुरला आलो. काही महिन्यांपूर्वी मी जेव्हा नागपुरात आलो होतो, तेव्हा मी परत गेल्यावर मनसेला पदाधिकारी नेमणूक करण्यासाठी माणसं मिळत नाही, अशी टीका करण्यात आली. मात्र आजचे चित्र तशी टीका करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे.”
विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता नंतर भाजपचा बालेकिल्ला झाला. काही काळानंतर सत्तांतर होत असते. नवीन लोक येतात आणि जुने जातात. हे पोट्टं कुठे काय करणार? असे विरोधक म्हणत असतात. मात्र तुम्ही खचून जाऊ नका कारण मात्र हाच पोट्टा वरवंटा फिरवणार असा इशारा पक्षाची खिल्ली उडवणाऱ्यांना राज ठाकरेंनी दिला आहे.
पक्ष उभारणीसाठी जीवाचं रान करावं लागतं. काँग्रेसच्या लोकांनी खूप संघर्ष केले. बाळासाहेब ठाकरे यांनीही अनेक वर्ष संघर्ष केले.1966 ला शिवसेना स्थापन झाली मात्र सत्ता 1995 ला आली. आजचे राजकारण पाहता प्रत्येकाला असे वाटते की, सर्वांना सर्व गोष्टी लवकर हव्या आहेत. सर्व पटकन झालं पाहिजे. मात्र त्यासाठी जीवाचं रान करावं लागते. आपल्याही जीवनात विजय झाले, पराभव झाले, मात्र खचलो नाही कधी आणि खचणार नाही. ज्या कुटुंबात माझा जन्म झाला तिथे असे संस्कारच नाही. आज ज्यांना नियुक्ती मिळाली आहे, त्यांच्यात काम करण्याची आग असली पाहिजे.. पराभव होतील मात्र खचून जाऊ नका. विरोधक तुमच्यावर हसतील, हे काय करत आहे असं म्हणतील. फक्त पाय जमिनीत रोवून उभे रहा, विजय आपलाच आहे, असा कानमंत्र राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला आहे.