पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव व हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत युवा संकल्प अभियानाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेन्द्र फडणवीस यांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मंगळवार, दिनांक ९ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी २ वाजता होत आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव व हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात देशभरात होत असून देशाच्या प्रत्येक नागरिकाने राष्ट्राभिमान व राष्ट्रप्रेमाची भावना प्रज्वलित होण्यासाठी भारताचा तिरंगा आपल्या घरावर फडकवण्याची ऐतिहासिक मोहीम केंद्र व राज्य शासनाने निर्देशित केली आहे. या उपक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अतिशय उत्साहाने आणि नावीन्यपूर्णतेने सहभागी होत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या निमित्ताने युवा संकल्प अभियानाची सुरुवात करत असून या संकल्पात विद्यापीठाचे ६ लाखांहून अधिक आजी माजी विद्यार्थी स्वयंप्रेरणेने सहभागी होतील, असे आवाहन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व घटकसंस्था, महाविद्यालये, परिसंथा, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा स्वयंप्रेरणेने सहभागी होत आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी दत्तक गावांमध्ये हा संकल्प प्रत्यक्षात आणण्याचा निर्धार केला आहे.
७५० हून अधिक महाविद्यालये, ६५,००० राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, ३००० हून अधिक प्राध्यापक यांच्या एकत्रित प्रयत्नातून ५ लाखाहून अधिक विद्यार्थी व नागरिक आणि विविध सामाजिक क्षेत्रापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे. या निमित्ताने पुणे, अहमदनगर, व नाशिक या तिन्ही जिल्ह्यात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थी कल्याण अधिकारी, प्राचार्य यांच्या जिल्हानिहाय आयोजन व सहविचार सभा आयोजित
केल्या गेल्या आणि या सभांना अत्यंत उस्फूर्त व संख्यात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा विभाग आणि इतर सर्व घटक संस्था महाविद्यालये व परिसंस्था आणि नागरिकांच्या सहभागातून किमान ५ लाखांहून अधिक व्यक्तींनी तिरंगा ध्वज हातात घेतलेला स्वतःच्या फोटोचा Largest Online Album of People Holding National Flag गिनीज जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा निर्धारही सावित्रीबाई फुले पुणे
विद्यापीठाने केला आहे. शिक्षण, संशोधन आणि प्रशासकीय विकासासोबतच विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक भरणपोषण व्हावे यासाठी विद्यापीठ अविरत कार्यरत आहे. विद्यार्थ्यांचे सामाजिक – सांस्कृतिक नेतृत्व तयार करून या विद्यार्थ्यांचे राष्ट्रनिर्मितीतील योगदान निश्चित करण्याची जबाबदारी विद्यापीठ पार पाडत आहे. याच बृहद्प्रकल्पाचा भाग म्हणून युवा संकल्प या अभियानाकडे पाहता येईल.
घरोघरी तिरंगा आणि स्वराज महोत्सव उपक्रमाचा युवा संकल्प शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. नामदार देवेन्द्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते होत आहे. या संकल्प शुभारंभ कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र – कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आयोजन समिती सदस्य डॉ. संजय चाकणे, प्रसेनजित फडणवीस, श्रीमती बागेश्री मंठाळकर, डॉ. संतोष परचुरे, संचालक विद्यार्थी विकास मंडळ, डॉ. प्रभाकर देसाई, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना, सर्व अधिष्ठाता, सर्व व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, इतर सर्व अधिकार मंडळाचे सदस्य, प्राचार्य, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत.
या युवा संकल्प अभियानात उस्फूर्त व स्वयंप्रेरणेने सहभागी होण्याचे आवाहन माननीय कुलगुरू डॉ. कारभारी काळे व माननीय प्र – कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी विद्यार्थी, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, प्राचार्य, संचालक, संस्थाचालक आणि पालक व नागरिकांना केले आहे. या युवा संकल्प अभियानात सहभागी होण्यासाठी तिरंगा ध्वज हातात धरून काढलेले स्वतःचे व इतरांचे छायाचित्र (फोटो) https://spputiranga.in/photoupload/
या किंवा
https://forms.gle/juJt9rtgnpo5fgZh9 या लिंकवर टाकावे, आवाहन करण्यात येत आहे.
लिंकवर फोटो अपलोड करताना घ्यावयाची काळजी व सूचना
१. एका फोटोत एकच व्यक्ती असावी. शक्यतो झेंडा दोन्ही हातानी छातीसमोर पकडून फोटो काढावा.
२. सेल्फी स्वरूपातील फोटो ग्राह्य धरला जाणार नाही.
३. चेहऱ्यावर स्वच्छ प्रकाशझोत असावा. फोटो काढताना उभे राहिल्यावर मागे स्वच्छ भिंत अथवा पडदा असावा. निसर्ग अथवा भिंतीवरील फोटो, पुतळे, सूचना अथवा नावाचे फलक असल्यास फोटो ग्राह्य धरला जाणार नाही.
४. एका व्यक्तीने वरील लिंकवरील स्वतःचा फक्त एकदाच फोटो अपलोड करावा.
फोटोचे आकारमान ६ ते ७ एमबी इतकेच असावे.