मुंबई : बहुचर्चित महाराष्ट्र विधानसभेच्या 166 अंधेरी पूर्व पोट निवडणूक आज पार पडली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार श्रीमती ऋतुजा रमेश लटके भाजपने जाहीर केलेले उमेदवार मुरजी पटेल या दोन नावांची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत होती. तथापि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दबाव आणल्यामुळे मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर प्रबळ दावेदार म्हणून ऋतुजा लटके समोर आल्या. परंतु आज झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये धक्कादायक आकडा समोर आला आहे. गुरुवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत केवळ 31.74% मतदान झाले आहे.
या निवडणुकीसाठी श्रीमती ऋतुजा रमेश लटके (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), श्री बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी पीपल्स), श्री मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी), श्रीमती निना खेडेकर (अपक्ष), श्रीमती फरहाणा सिराज सय्यद (अपक्ष), श्री मिलिंद कांबळे (अपक्ष), श्री राजेश त्रिपाठी (अपक्ष) या सात उमेदवारांमध्ये लढत झाली. यामध्ये ऋतुजा लटके यांचे पारडे जड असले तरी ही तब्बल 68.26% मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. हा आकडा नक्कीच धक्कादायक आहे. आता सहा नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे त्यानंतरच या सातही जणांचे भविष्य स्पष्ट होऊ शकते.