उद्या देशभरात हनुमान जन्मोत्सव साजरा होत असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.
राज्य सरकारांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखावी. शांततेत उत्सव साजरा करावा. समाजात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर लक्ष ठेवा. तसेच धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या, असं या मार्गदर्शक सूचनेत केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्रात राम नवमीच्या आदल्या रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटामध्ये दंगल उसळून नुकसान झाले होते. येथील किराडपुरा भागातील राम मंदिरासमोर रात्री बारा साडे बाराच्या सुमारास मुलांच्या दोन गटात वाद झाला. त्याचे रूपांतर भांडणात झाले. त्यानंतर काही समाजकंटकांनी दगडफेक करून पोलिसांची वाहन पेटवून दिल्याची घटना घडली होती.
गेल्या वर्षी दिल्लीच्या जहांगीरपुरी परिसरातील जी ब्लॉकमध्ये हनुमान जयंतीच्या शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे दंगल भडकली होती. मशिदीसमोरून ही शोभायात्रा निघाली होती. पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये रामनवमीच्या दिवशी हिंसा भडकली होती. समाजकंटकांनी या दोन्ही जिल्ह्यात प्रचंड दगडफेक केली होती. तसेच अनेक ठिकाणी जाळपोळ केली होती. त्यामुळे पोलिसांना जमावाला पांगवताना लाठीमार करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर हनुमान जयंतीचा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केल्या आहेत.