गौतमी पाटील तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये घेते. आम्ही फक्त 5 हजार रुपये वाढवून मागितले तर बाजार मांडल्याचा आरोप होतो. अशी टीका इंदुरीकर महाराज यांनी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर केली होती. या टीकेला गौतमी हिने प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.
इंदुरीकर महाराज म्हणाले होते, ” गौतमी पाटील तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये घेते. आम्ही फक्त 5 हजार रुपये वाढवून मागितले तर बाजार मांडल्याचा आरोप होतो. तिच्या कार्यक्रमात राडा होतो. मुलांचे ढोपर फुटतात. पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागतो. गौतमीला संरक्षण दिलं जातं. मात्र आम्हाला संरक्षण नसतं, अशी टीका इंदुरीकर महाराज यांनी केली होती.
या टीकेला गौतमी पाटील हिने कोणतेही उत्तर दिले नव्हते. मात्र सोशल मीडियातून इंदुरीकर महाराज यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी देखील इंदुरीकर महाराज यांच्यावर टीका केली होती. आता गौतमी पाटील हिने इंदुरीकर महाराजांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
गौतमी पाटील म्हणाली, “ते महाराज आहेत. मी काय बोलणार त्यांच्याविषयी. फक्त गैरसमज नका करू. महाराजांचा गैरसमज झाला आहे. ते सांगतात तेवढं मानधन नाही. हे प्रेक्षकांनीही ध्यानात घ्यावं. मी तीन गाण्याला तीन लाख रुपये घेतले असते तर लोकांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजनच केले नसते. आमच्या टीममध्ये 11 मुली असतात. एकूण 20 जणांची आमची टीम आहे. या सर्वांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे मानधन आम्ही घेतो. पण महाराज सांगतात तेवढं घेत नाही”
“माझ्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होत असते. प्रेक्षक उपस्थित राहून एन्जॉय करतात. इतकी मोठी गर्दी होत असेल तर मी माझ्यासाठी संरक्षण मागणारच ना? महाराजच नव्हे तर कुणीही काही बोललं, टीका केली तरी माझं काम सुरु आहे. मला काही अडचण नाही. कारण मी कशी आहे हे माझं मला माहिती आहे” असं गौतमी म्हणाली.