उत्तर प्रदेश : उत्तरप्रदेश मधील मथुरा येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक कलहाला कंटाळून एका महिलेने आपल्या दोन मुलींना विष पाजले. या महिलेला तीन मुली असल्याची माहिती मिळते. तिसऱ्या मुलीने विष प्यायले नव्हते, त्यामुळे ती बचावली आहे. यामध्ये या दोन मुली पैकी एका मुलीचा आणि या महिलेचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कौटुंबिक कलहाला कंटाळून नीरज देवी उदयवीर सिंह या महिलेने आपल्या तीन मुलींना खोकल्याचे औषध सांगून विष दिले आहे. यातील दोन मुलींनी ते विष औषध समजून प्यायले, तर तिसऱ्या मुलीने औषध पिण्यास नकार दिला. दोघींना विष पाजल्यानंतर या महिलेने देखील विष प्यायले.
मध्यरात्री या दोन्हीही मुलींना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान पहाटे एका मुलीचा आणि महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे.
या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.