कोण आहेत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू ? जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

361 0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 21 जून रोजी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रपतिपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती राहिलेल्या प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर आता महिला राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीये. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात द्रौपदी मुर्मू या नेमक्या कोण आहेत.

द्रौपदी मुर्मू या एक आदिवासी राजकीय नेत्या आहेत. 64 वर्षीय द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात झाला. बिरांची नारायण तुडू असं त्यांच्या वडिलांचं नाव आहे. त्या संथाल कुटुंबातील आहेत, जो एक आदिवासी वांशिक गट आहे. मुर्मू या प्रदीर्घ काळापासून भाजपशी जोडलेल्या आहेत. द्रौपदी मुर्मू या आदिवासी वंशाच्या आहेत. त्यांनी ग्राऊंड झिरोपासून राजकारणात कामाला सुरुवात केली होती. 1997 मध्ये त्या रायरंगपूरमधून पहिल्यांदा नगर पंचायतीत नगरसेवक झाल्या. यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूरमधून 2 वेळा आमदारही राहिल्या आहेत. त्या भाजपा आणि बिजू जनता दलाच्या (BJD) युती सरकारमध्ये मंत्रीही होत्या. द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत. तसेच 2000 मध्ये स्थापन झाल्यापासून 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या त्या झारखंडच्या पहिल्या राज्यपाल आहेत.

द्रौपदी मुर्मू यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. विशेषतः सर्वच स्त्रियांना द्रौपदी मुर्म यांचा जीवनसंघर्ष भावूक करणारा व प्रेरणादायीही आहे. दलित, आदीवासी, लहान मुले यांच्या ऊत्थापनासाठी झटणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांची वैयक्तिक जीवनात अनेक संकटामुळे अक्षरशः होरपळ झाली. त्यांना दोन मुले व एक मुलगी. २००९ साली २५ वर्षाचा मुलगा मरण पावला. हा धक्का त्यांना सहन झाला नाही. त्या डिप्रेशन मध्ये गेल्या. त्या पुन्हा ऊभ्या राहतात तोच दुसरा मुलगा २०१३ साली रस्ता अपघातात गेला. त्याच महिन्यात आई गेली, कर्तबगार भाऊही गेला. चार वर्षात जवळची सगळी माणसे हरवली. आणि २०१४ साली पती शाम चरण मुर्मूही गेले. त्या एकाकी झाल्या. नियतीने त्यांच्यावर घोर अन्याय केला. या सगळ्या संकटानंतर कोणीही कोलमडले असते. त्याही कोलमडल्या. पण पुन्हा ऊभ्या राहिल्या. ताठ ऊभ्या राहिल्या. आजही त्या मयुरभंज येथे एका साध्या दुमजली घरात राहतात.

विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे करण्यात आलं आहे. तसच या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, फारुख अब्दुल्ला यांची नावे समोर आली होती. मात्र दोघांनीही त्यासाठी नकार दिला होता. भाजपच्या पूर्वेकडील भागातून कुणी उमेदवार द्यावा आणि कुणी महिला उमेदवार असावी. आदिवासी समाजातील कुणी राष्ट्रपती आजवर भारतात झाले नाही, त्यामुळे आम्ही आदिवासी समाजातील व्यक्ती उमेदवार म्हणून देण्याचं ठरवलं असून त्यानुसार द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर एकमत झालं असल्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सांगितलं. तसंच माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचे उमेदवार असणार आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!