पुणे : शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याच्यादृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, उत्कृष्ट पद्धतीची खते, दर्जेदार कृषी औजारे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचतील यासाठी कृषी विभागाने प्रयत्नशील रहावे, असे प्रतिपादन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
कृषी आयुक्तालय येथे आयोजित राज्यस्तरीय रब्बी हंगाम बैठकीत ते बोलत होते. बैठकीस फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, सहकार आयुक्त अनिल कवडे, कृषी आयुक्त धीरजकुमार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे (पोक्रा) प्रकल्प संचालक श्याम तागडे, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गणेश पाटील, सहसचिव सरिता बांदेकर आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांमध्ये कमी कालावधीत येणारे आणि जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांचे वाणाचा अधिक प्रसार व्हावा यासाठी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने काम करावे, असे निर्देश देऊन मंत्री श्री. सत्तार म्हणाले, कमी कालावधीची पिके घेण्यास प्रोत्साहन दिल्यास अधिक पिकांद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. पिकांवर येणाऱ्या नवनवीन किड-रोगांवर विद्यापीठांनी संशोधन करुन उपाययोजना शोधाव्यात.
ड्रोन तंत्रज्ञानाबाबत शासनाची सकारात्मक भूमिका
कृषीमंत्री श्री. सत्तार म्हणाले, ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीमध्ये क्रांती होईल. औषध फवारणी, पीकांच्या वाढीचे संनियंत्रण आदींसाठी ड्रोन तंत्रज्ञान उपयुक्त आहे. ड्रोनद्वारे ८ मिनिटात १ एकर फवारणी होऊ शकते. तसेच औषधी द्रव्य अधिक प्रमाणात पर्यावरणात पसरत नाही. परंपरागत पद्धतीने फवारणीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना विषबाधा होते. ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यावर मात करणे सहज शक्य आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षण व जीवित हानी होत नाही. त्यामुळे या तंत्राबाबत राज्य शासन सकारात्मक विचार करत आहे. ड्रोन शेतीच्या प्रचारासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल.
कृषी यांत्रिकीकरण उप अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रमाचा आढावा घेताना या योजनांच्या अनुदानातून ज्या कृषी साहित्य, औजारांची खरेदी शेतकऱ्यांद्वारे होते त्यांचा दर्जा तपासून तो चांगला असेल याची खात्री करावी, अशाही सूचना श्री. सत्तार यांनी दिल्या.
खताबाबत लिंकींगच्या तक्रारी आल्यास कारवाई करा
खते खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना दुकानदारांनी अनावश्यक खते खरेदी करण्याची सक्ती केली जाऊ नये यासाठी अधिकारी व क्षेत्रस्तरीय कर्मचाऱ्यांनी नियमित तपासणी करावी. अशा प्रकारच्या लिंकिंगच्या तक्रारी आल्यास कठोर कारवाई करावी, असे निर्देश कृषीमंत्र्यांनी बियाणे, खत उपलब्धतेचा आढावा घेताना दिले. राज्यात आगामी रब्बी हंगामासाठी आवश्यक बियाणे व खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.