कोल्हापूर : शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार धडक कारवाई करून प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या खानाच्या कबरीवरील अतिक्रमण काढण्यात आले. याबद्दल संभाजी छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून संभाजी छत्रपती यांनी लिहिले आहे की, स्वराज्यावर चालून आलेला आदिलशाही सरदार अफजल खानाला महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला ठार मारला. मरणानंतर वैर संपते या भावनेने महाराजांनी त्याच ठिकाणी विधिवत दफन करून खानाची कबर बांधली असं इतिहासकारांचे मत आहे. परंतु अलीकडच्या काळात काही लोकांनी अफजलखानाचे उदात्तीकरण करत या कबरीवर अतिक्रमण करून सरकारी जमिनीवर ताबा मिळवला होता.
न्यायालयाने अनेक वेळा आदेश देऊन सुद्धा हे अतिक्रमण काढण्याचे धाडस आज पर्यंतच्या कोणत्याच सरकारने दाखवलं नव्हतं. परंतु काल शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार धडक कारवाई करत खानाच्या कबरीवरील अतिक्रमण काढण्यात आलं. त्यांच्या या धाडसी निर्णयाच कौतुक करावं तितकं थोडं आहे असे या पत्रामध्ये संभाजी छत्रपती यांनी म्हटले आहे.