ठाणे : भिवंडी शहरातील (Bhiwandi News) गौरीपाडा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अचानक दोन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. या भीषण दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण जखमी झाले आहेत. यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
दोन मजली इमारतीच्या मागच्या बाजूचा भाग पूर्णतः कोसळला आहे. ज्यामध्ये अनेक जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तातडीने भिवंडी अग्निशमाक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तात्काळ बचाव कार्य सुरु केलं. इमारतीच्या ढिगार्याखाली सहा जण अडकल्याचे निष्पन्न झाले. यापैकी चार जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले तर दोन जणांचा या ढिगार्याखाली दबून मृत्यू झाला. या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विशेष म्हणजे भिवंडी शहरातील गौरीपाडा परिसरात असलेल्या या इमारतीला 40 ते 45 वर्ष पूर्ण झाली आहेत. भिवंडी महानगरपालिकेच्या वतीनं या इमारतीला दोन वेळा नोटीसा देखील बजावण्यात आल्या असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्याकडून देण्यात आली. या दुर्घटनेसंदर्भात मनपा आयुक्त अजय वैद्य यांनी सांगितले की, ही अतिशय दुखद घटना असून या इमारतीचे स्ट्रक्चर कसे कोसळले याची चौकशी करण्यात येईल आणि यामध्ये जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येणार आहे.