ग्रामपंचायत कार्यालयात पिठाची चक्की, फुक्कट दळण दळून घ्या ?

487 0

सरकारी तिजोरीत कररुपी महसूल येण्यासाठी सरकारला अनेक आयडिया कराव्या लागतात. अशीच एक आयडिया वर्धा जिल्ह्यातील मनसावळी ग्रामपंचायतीने लढवली आहे. ग्रामपंचायतीने कार्यालयात चक्क पिठाची गिरणी उभी केली आहे. या ठिकाणी नागरिकांनी यायचं आपले धान्य दळून घ्यायचं पण त्यासाठी एक भक्कम अट ठेवली आहे.

हिंगणघाट तालुक्यात राळेगाव मार्गावर मनसावळी हे १२०० लोकसंख्येचे गाव आहे. या गावात गेल्या काही वर्षांत कर वसुली ही कमी प्रमाणात होती. कर भरायला मागेपुढे पाहणाऱ्या अनेकांनी गेली सात-आठ वर्षे कराचा भरणा केला नसल्याची उदाहरणे या गावात होती. ग्रामपंचायतीचे आर्थिक उत्पन्नाचे साधन असलेल्या कर वसुलीसाठी कर्मचारी घरोघरी पोहचले तरी प्रतिसाद मिळत नव्हता.

त्यामुळे मनसावळीचे सरपंच प्रांजली मुकेश भोयर यांनी करवसुलीसाठी गावात कर देणाऱ्यांना मोफत दळण दळून देण्याचा निर्णय घेतला. याला ग्रामसेविका दीपिका धोपटे यांची साथ मिळाली. ग्रामपंचायतच्या १५ व्या वित्त आयोगाचा निधी आणि विशेष फंडातून आटा चक्की खरेदी करण्यात आली. आटोमॅटिक पद्धतीने चालणारी ही चक्की नागरिकांना देखील चालविणे सोपे झाले. ‘गहू टाका, बटन दाबा आणि दळण दळून घेऊन जा’ असा उपक्रम सुरू झाला. या उपक्रमाला ग्रामस्थांनी भरघोस प्रतिसाद दिला. ग्रामस्थाने कर भरला आहे की नाही याची खातरजमा करून ग्रामस्थांना दळण दळून दिले जात होते. घर कराची पावती गिरणीवर दाखवून गहू, ज्वारी, बाजरी, डाळ आदी धान्य मोफत दळून दिले जात आहे.

या उपक्रमाचा परिणाम करवसुली होण्यात झाला. ग्रामपंचायतीचे कर गोळा होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. २०२१-२२मध्ये १ लाख ५० हजार रुपये कर वसुली झाली. तर २०२२-२३मध्ये १ लाख ९० हजार रुपये इतकी करवसुली झाली आहे.

करवसुली झाली लाईट बिलाचे काय ?

पिठाची गिरणी सुरु झाल्यावर ग्रामपंचायतसमोर वीजबिल भरण्याचा प्रश्न निर्माण झाला. थ्री फेजचे मीटर येथे बसविण्यात आले आहे. देखभाल दुरूस्तीसाठीदेखील खर्च लागेल. वीज बिल भरण्यासाठी पैसे उपलब्ध झाले नाही तर सरपंच आणि सदस्यांच्या तीन महिन्यांच्या मानधनातून आम्ही विजेचे बिल भरू, असे सरपंच प्रांजली भोयर यांनी सांगितले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!