नाशिक : चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनात अॅड. निकम (Ujjwal Nikam) यांची विश्वास ठाकूर (Vishwas Thakur) यांनी मुलाखत घेतली. यावेळी हायप्रोफाईल वकील उज्ज्वल निकम यांनी अनेक प्रश्नांवर आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना राजकारणात येणार का? असे विचारले असता त्यांनी राजकारण हा माझा प्रांत नाही अशी प्रतिक्रिया दिली. तसेच अडीच वर्षांपूर्वी मला जळगावातून खासदारकीची ऑफर आली होती. नंतरही दोन-तीन राजकीय पक्षांनी आवतण दिले होते. त्याविषयी फार गांभीर्याने विचार केला नाही. कारण, राजकारणासाठी पैसे लागतात. केवळ लोकांच्या शाबासकीने काही होत नाही,’ असे मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. कुसुमाग्रज स्मारक (Kusumagraj Memorial) येथे रविवारी हा कार्यक्रम झाला.
यावेळी उज्ज्वल निकम यांनी आपल्या न्यायव्यवस्थेबाबत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले ‘1993 चा बॉम्बस्फोट खटला लढविण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) पाहिलेही नव्हते. युक्तिवाद करताना एकसुरी बोलल्यास न्यायाधीशांना कंटाळा येऊ शकतो. संस्कृत श्लोकांचा वापर करून, आवाजात चढउतार करून बोलल्यास युक्तिवाद प्रभावी होतो असे उज्ज्वल निकम म्हणाले.
‘न्यायालय हा लोकांसाठी आशेचा शेवटचा किरण असून, न्यायव्यवस्थेबाबत सामान्यांच्या मनात शंका येणे ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे निवृत्त न्यायाधीशांना कोठेही नियुक्ती दिली जाऊ नये,’असे मतदेखील उज्ज्वल निकम यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी त्यांनी त्यांची अँजिओप्लास्टी झाल्यानंतर कुख्यात गुन्हेगार अबू सालेमने (Abu Salem) तुरुंगातून निकम यांना हिंदीतून दीड पानी पत्र पाठवले व ‘काळजी घ्या’ असे सांगितले होते असा खुलासा देखील उज्ज्वल निकम यांनी यावेळी केला.