सातारा : “संभाजीराजेंना धर्मवीर नव्हे स्वराज्य रक्षक म्हणा…!”, या वक्तव्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर सत्ताधारांनी कडाडून टीका सुरू केली आहे. दादा आधी बोलले असते तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना आधीच उत्तर दिलं असतं. संभाजी महाराजांना धर्मवीर हे नाव आज नाही देण्यात आलेलं. त्यांनी हिंदू धर्म रक्षणासाठी बलिदान दिलं. त्यामुळे त्यांना धर्मवीर म्हटलं जातं, असं सांगतानाच अजितदादांचं म्हणणं म्हणजे दुसऱ्याला शिकवावे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण असं आहे. याप्रकरणाने महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशाराच राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिला आहे.
शंभुराज देसाई यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना विरोधकांवर कडाडून टीका केली आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना बऱ्याच आमदार आणि माजी आमदारांना सुरक्षा देण्यता आली होती. जेव्हा एखाद्या लोकप्रतिनिधीच्या जीवाला धोका असतो तेव्हा त्याची माहिती घेऊनच त्याला सुरक्षा यंत्रणा पुरवली जाते, असं शंभुराज देसाई यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.
राज्याच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवत आहोत. आम्ही शांत आहोत. तोपर्यंत आमचा अंत पाहू नका. आम्ही व्यक्त झालो तर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकेल, असा इशाराच देखील मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिला आहे.