मुंबई- बंडखोर आमदार अजूनही शिवसेनेचे आहेत, मुख्यमंत्रीही शिवसेनेचे आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीकडे बहुमत आहे, त्यामुळे राज्य सरकारला कोणताही धोका नाही. ऱाष्ट्रवादीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूर्ण पाठींबा असून सद्यस्थितीतील पेचप्रसंगावर रणनिती ठरवण्यासाठी शिष्टमंडळासह आज सायंकाळी मुख्यमंत्री ठाकरेंची भेट घेणार आहोत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली.
अजित पवार आज माध्यमांशी बोलत होते. अजित पवार म्हणाले, “मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुढील रणनीती ठरवली जाईल. विधीमंडळाबाबत काही निर्णय असतील तर ते अध्यक्ष घेतील. एनडीएचे सरकार सत्तेत असताना 25 पक्ष सोबत होते, त्यानंत यूपीएचे सरकारही अनेक पक्षांनी मिळून बनले होते.
अजित पवार म्हणाले की, गेल्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रावर जी काही संकटं आली, त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम केलं. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून उद्धव ठाकरेंचा समावेश टॉपच्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत होता. त्यामुळे या काळात महाविकास आघाडीने चांगलं काम केलं आहे. सुरुवातीला एक वर्षे जरी मुख्यमंत्री मातोश्रीवर असले तरीही कामकाज सुरु होतेच, सरकारही चालतच होते.