सांगली, सोलापूर पाठोपाठ नांदेडच्या सहा तालुक्यांना नकोसा झाला महाराष्ट्र !

519 0

नांदेड : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या महाराष्ट्र-कर्नाटक वादातील वक्तव्यानंतर पुन्हा एकदा सीमावादाचा प्रश्न पेटला असताना आता नांदेड जिल्ह्यातल्या सहा तालुक्यांना महाराष्ट्र नकोसा झालाय. नांदेड जिल्ह्यातल्या सहा तालुक्यांची खदखद समोर आलीय.

नांदेड जिल्ह्यातल्या सहा तालुक्यांनी आम्हाला तेलंगणात जायचं आहे, अशी मागणी केली आहे.माहूर, उमरी, देगलूर, बिलोली, किनवट, धर्माबाद या तालुक्यातील नागरिकांनी तेलंगणात जायची इच्छा व्यक्त केलीय. तसेच या प्रकरणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशाराही दिलाय. त्यासाठी “प्रश्न सीमावर्ती भागातील नागरिकांचे” ही कृती समिती स्थापन करण्यात आलीय.नांदेड जिल्ह्यातले अनेक तालुके मागास आहेत.

तिथल्या लोकांना हव्या त्या सोयी-सुविधा मिळत नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केलाय. तेलंगणात मात्र परिस्थिती वेगळीय. तिथे मजूर, नोकरदार आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार उभे राहते. मोफत वीज, पाणी, बी-बियाणे, शेती अवजारे मिळतात. कृषीपंप, विहिरीच्या योजना आहेत. त्यामुळे तिकडे जीवन सुकर होईल, असे या भागातल्या नागरिकांना वाटू लागलंय.

एकूणच महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटलेला असताना आता नांदेड जिल्ह्यातल्या सहा तालुक्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार लवकरात लवकर काय तोडगा काढणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!