‘स्वातंत्र्याच्या अमृतकाळात महाराष्ट्राच्या विकासाचे ‘पंचामृत’ सूत्र घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा संपूर्ण राज्यातील प्रत्येक घटकाच्या आशांना प्रतिसाद देणारा व त्यामुळे सर्वाना आनद देणारा अर्थसंकल्प आहे’ असे प्रतिपादन महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष श्री.माधव भांडारी यांनी आज पुणे येथे केले. राज्याच्या अर्थसंकल्पामुळे पुणे व पश्चिम महाराष्ट्राला मिळालेल्या लाभाची माहिती देण्यासाठी पुणे भाजपाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘भाजपा-शिवसेना युतीचे सरकार समाजाप्रती संवेदनशील सरकार असल्याचे या अर्थसंकल्पाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. अध्यात्म आणि विकासाची अनोखी सांगड घालणारा हा ‘पंचामृत अर्थसंकल्प’ आहे. हा अर्थसंकल्प राज्याच्या भरकटलेल्या व ठप्प झालेल्या विकासाला पुन्हा योग्य दिशेला आणून चालना देणारा आहे. या अर्थसंकल्पातील विविध तरतुदी व प्रस्तावित योजना महाराष्ट्राला पुन्हा देशात अव्वल स्थानावर नेण्याऱ्या आहेत’ असे प्रतिपादन देखील त्यांनी यावेळी बोलताना केले.
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जनभागीदारीतून अर्थसंकल्प सादर केला गेला हे या अर्थसंकल्पाचे सर्वात मोठे व महत्वाचे वैशिष्ट्य आहे. ४० हजार नागरिकांनी पाठवलेल्या सूचना विचारात घेऊन, त्यांच्या साह्याने तयार केलेला हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने लोकांना हवा असलेला अर्थसंकल्प ठरला आहे. शेतकरी, महिला, नोकरदार, विद्यार्थी, अल्प मानधनात काम करणारे शिक्षणसेवक व अंगणवाडी सेविका-मदतनीस, छोटे व्यापारी, अन्य मागासवर्गिय, आदिवासी, दलित बांधव, मच्छिमार, निराधार नागरिक, दिव्यांग आदी समाजातील सर्व घटकांचा या अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे. या प्रत्येक घटकासाठी अर्थसंकल्पात दिलासादायक तरतूद केली आहे.
१२ हजार रुपये सन्मान निधी, एसटी प्रवासात महिलांना ५०% सवलत, अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मानधन, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ अशा अनेक नव्या तरतुदी या अर्थसंकल्पाद्वारे केल्या आहेत. विशेषत: पं.महाराष्ट्र व कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी लागू केलेली काजू फळ विकास योजना क्रांती घडविणारी आहे. लेक लाडकी योजनेतून मुलीला १८ वर्ष झाल्यावर ७५ हजार रुपये, महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण, इतर मागासवर्गीयांसाठी १० लाख घरांची मोदी आवास घरकुल योजना, आपला दवाखाना आदी योजना शोषित वंचित घटकांचे जीवनमान कायमस्वरूपी बदलून टाकणाऱ्या योजना आहेत.
पुणे शहर व प.महाराष्ट्रासाठी केलेल्या महत्वाच्या तरतुदींचा तपशील सोबत देत आहे. तो पाहिल्यावर लक्षात येईल की हा अर्थसंकल्प पुणे परिसर व संपूर्ण प.महाराष्ट्राच्या विकासाला वेगवान चालना देणारा ठरणार आहे. उद्योग व पर्यटन या दोन्ही क्षेत्रांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची निर्मिती वेगाने करण्यावर भर देत असतानाच उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी या शहराच्या, परिसराच्या तसेच प.महाराष्ट्राच्या इतिहास व परंपरांचे जतन करून संवर्धन करण्याची जी भूमिका घेतली आहे ती यापूर्वी कोणत्याही सरकारने घेतली नव्हती.
या दिशेने उचललेल्या पावलांमुळे युवकांना व्यवसाय व रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर या भागाचा समृद्ध व प्रेरणादायी इतिहास जो आजपर्यंत जगासमोर आलाच नाही अथवा येऊ दिला नाही तो इतिहास सर्वाना बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी व अभ्यासासाठी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रातील भाजपा शिवसेना युतीचा मा.देवेंद्रजींनी मांडलेला हा अर्थसंकल्प सर्व अर्थांनी ‘चित्र बदलणारा’ Game Changer ठरणार आहे.