पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागरीकांच्या करांच्या पैशातून नागरीकांना घरोघरी विनामूल्य तिरंगा ध्वज महापालिकेच्या वतीने वाटण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे.
शहरात लोकांना प्रेरणा देण्यासाठी कायमस्वरूपी फडकत राहणारे शंभर फुटी ध्वजस्तंभावर भव्य ध्वज महापालिकेच्या वतीने कात्रज , शनिवारवाडा, येरवडा , खराडीसह पाच ठिकाणी उभे करण्यात आले होते. यासाठी नागरीकांच्या करांचे जवळपास पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र हे ध्वज खूप मोठे आणि उंचीवर असल्याने ते फाटतात असे कारण देण्यात आले.आणि गेले अनेक महिने हे ध्वजस्तंभ रिकामेच आहेत.
खरं तर हि समस्या येते आहे हे कात्रज येथे पहिला ध्वजस्तंभ उभारला तेंव्हाच लक्षात आल होत , तरी अट्टाहासाने आणखी चार ठिकाणी हे ध्वजस्तंभ उभे करण्यात आले.
या पाच ध्वजस्तंभावर दरवर्षी लाखो रुपये देखभाल दुरुस्ती वर खर्च केले जातातच , तरीही हे झेंडे मात्र लावले गेलेले नाहीत. आता निदान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तरी या सर्व ध्वजस्तंभांवर ध्वज उभारावे आणि ज्या उद्देशाने ते उभारले आहेत तो उद्देश साध्य करण्यासाठी कायमस्वरूपी फडकत रहावे.अशी मागणी सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.