मुंबई : महाराष्ट्र आणि मुंबई विषयी वादग्रस्त वक्तव्य करून पुन्हा चर्चेत आलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची जोड उठत असून त्यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येतोय.
मात्र वादग्रस्त वक्तव्य करण्याची भगतसिंग कोश्यारी यांची ही काही पहिली वेळ नाही. या अगोदर देखील अनेक वक्तव्य करून कोश्यारी चर्चेत आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलत असताना ‘आपल्या समाजात गुरूला मोठं स्थान असतं.’ महाराज, चक्रवर्ती अनेक झाले. पण, चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारणार? समर्थ रामदासांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? समर्थांच्याच कृपेनं शिवाजी महाराजांना राज्य मिळालं होतं, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते. कोश्यारी यांच्या या विधानाला इतिहासकारांनी जोरदार आक्षेप घेतला होता. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व कमी लेखण्याचा व रामदासांना त्यांचे गुरू म्हणून थोपवण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका काही इतिहासकार व अभ्यासकांनी केली होती.
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोलतानाही भगतसिंह कोश्यारी यांची जीभ घसरली होती. सावित्रीबाईंचं लग्न वयाच्या दहाव्या वर्षी झालं. तेव्हा त्यांचे पती १३ वर्षांचे होते, असं सांगून, लग्न झाल्यावर मुलगा-मुलगी काय करतात?, असा प्रश्न त्यांनी हसत हसत विचारला होता. त्यावरूनही देखील त्यांच्यावर टीका झाली होती.
पुण्यातील एका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारींच्या हस्ते सायकलपटूंचा सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी फोटो काढताना राज्यपालांनी महिलेच्या तोंडावरचा मास्क स्वत:च्या हातांनी खाली खेचला होता. राज्यात करोनाचा संसर्ग वाढत असतानाचे ते दिवस होते. प्रत्येकानं मास्क घालावं, असं मुख्यमंत्री व पंतप्रधान सतत सांगत होते. असं असतानाही राज्यपालांनी हे कृत्य केल्यामुळं त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.
कोश्यारी हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत. तिथल्या राजकारणात ते एक वजनदार नेते म्हणून प्रसिद्ध होते. मात्र, तिथंही त्यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली होती. कोश्यारी यांनी माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांच्यावर एका सभेत एकेरी भाषेत टीका केली होती. तसंच, बहुगुणा नेमके कोण आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी डीएनए टेस्ट करावी, असं आव्हान त्यांनी दिलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.