मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभेची निवडणूक आता उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची मानली जाते आहे. दरम्यान रमेश लटके यांच्या मृत्यूनंतर अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून या पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
या निवडणुकीमुळे सध्या वातावरण चांगलंच तापलं असताना, भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले की, “काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला भाजपने उमेदवारी दिली आहे. ही गर्दी म्हणजेच आमच्या मुरजी भाईंच्या कामाची पोचपावती आहे. मला विश्वास आहे की जसं आता वातावरण आहे तसं निवडणूक झाल्यावरही दिसेल.
तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधून ते म्हणाले की, “त्यांना स्वतःचा पक्ष वाचवता आला नाही, चिन्ह वाचवता आलं नाही… वडिलांच्या आजारपणावेळी आदित्य ठाकरे बाहेरगावी पार्ट्या करत होते. एकदा प्रवासादरम्यान स्वतः रमेश लटके यांनी मला त्यांना किती मानसिक त्रास होतो आहे हे सांगितलं होतं. त्यांचे फोन मातोश्रीवर उचलण्यात येत नव्हते. उद्धव ठाकरे हे त्यांची भेट घेण्यास तयार नव्हते. असा आरोप नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.