पुणे : मनसेचे नेते अमित ठाकरे कालपासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अमित ठाकरे विद्यार्थ्यांशी तसेच मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. मात्र अमित ठाकरे संपूर्ण दौऱ्यात माध्यमांशी बोलण्यापासून दोन हात लांबच आहेत. यावर आज पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता ठाकरेंनी खास ठाकरी शैलीत उत्तर दिले आहे.
आज पुण्यातील पत्रकार भवन येथे त्यांनी पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी अमित ठाकरे यांना, तुम्ही पत्रकारांशी बोलणं का टाळता, पत्रकारांना कंटेंट का देत नाही, असा प्रश्न केला. त्यावर त्यांनी ते कामं करायला संजय राऊत आहेत ना असा टोला मारला. त्यावर पत्रकारांनी ते सध्या आतमध्ये आहेत असा प्रश्न केला त्यावर मी कायं संजय राऊंतांची रिप्लेसमेंट आहे का ? अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली यावर एकच हशा पिकला.
तर, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अमित ठाकरे गृहमंत्री होणार अशा आशयाच्या बातम्या आल्या होत्या त्यावर देखील अमित ठाकरे यांनी दिलखुलास प्रतिक्रिया दिली. मी गृहमंत्री होणार ही अफवा होती, पण पुढचे वीस दिवस मला पत्रकार याबाबतच विचारत होते. ही बातमी खोटी आहे, हे सांगून मी थकलो होतो. म्हणून मी म्हटलं गृहमंत्री पद दिलं तर आपण विचारू करू. असं अमित ठाकरे म्हणाले. दरम्यान, मला जेव्हा विद्यार्थी सेनेचं अध्यक्ष केलं गेलं तेव्हा देखील आदल्या दिवशी समजलं होत. त्यामुळे ही बातमी मी जेव्हा सकाळी झोपेतून उठल्यावर ऐकली तेव्हा वाटलं आता थेट शपथ घ्यायला जायचंय की काय ? असा प्रश्न मला पडला होता. अशी मिश्किल टिपण्णी अमित ठाकरे यांनी केली. मात्र, मला राज ठाकरेंच्या मंत्रिमंडळात बसायला आवडेल, ते सांगतील तेच मी करेन. असं देखील ते पुढे म्हणाले.
दुसरीकडे, सगळे नेते राज्याचे दौरे करतायेत, मुख्यमंत्री ही राज्यभर फिरतायेत. तुम्हाला काय दिसतंय, काय करायला हवं असं वाटतंय? असा प्रश्न अमित ठाकरेंना विचारला असता ते म्हणाले, “सगळंच करायला हवं, काय होतच नाही सध्या. पण सध्या मी विद्यार्थ्यांसाठी फिरतोय, त्यांच्याशी संवाद साधतोय, त्यांचे प्रश्न जाणून घेतोय. रोजगार, आरक्षण आणि स्पर्धा परीक्षा या समस्या विध्यार्थ्यांना भेडसावत आहेत. या सोडविण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात मनविसेची शाखा असायला हवी. यामुळं माझा आणि त्यांचा संपर्क व्हायला हवा, त्यासाठी मी सध्या प्रयत्नशील आहे. त्याचानुषंगाने मी हा दौरा करतोय”. असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.
एकाकीकडे अमित ठाकरे यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे देखील राज्यभर फिरत आहेत. आदित्य ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले होते मी युवकांना कोणत्या तोंडाने सांगू, तुम्ही राजकारणात या ? यावर देखील अमित ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “तुमच्या सारख्या युवकांची गरज आहे, तुम्ही राजकारणात नक्की या. माझ्यावर विश्वास ठेवून राजकारणात या”. असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.