केरळमधील एका ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान, आग लावून ३ प्रवाशांना जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. त्याला रत्नागिरी येथून अटक करण्यात आली आहे.
शाहरुख सैनी असे या आरोपीचे नाव आहे. सेंट्रल इंटेलिजन्स आणि महाराष्ट्र एटीएस यांच्या संयुक्त पथकाने रात्री उशिरा रत्नागिरी रेल्वेस्टेशन जवळून त्याला अटक केली.
घटना काय घडली ?
अलप्पुझा आणि कन्नुर एक्झिक्युटिव्ह एक्सप्रेसमध्ये २ एप्रिल रोजी रात्री सुमारे ९.४५ च्या दरम्यान, कोझिकोड शहर ओलांडल्यानंतर कोरापुझा रेल्वे पुलावर ट्रेन पोहोचली असताना प्रवाशांसोबत झालेल्या वादातून आरोपी शाहरुख सैफी याने सहप्रवाशांवर एक ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना पेटवून दिले. त्यावेळी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तीन प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. यामध्ये एक वर्षाच्या मुलासह एक महिला आणि एक अन्य व्यक्ती अशा तीन जणांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह रेल्वे रुळावर सापडले होते. तर इतर ८ प्रवासी जखमी झाले होते. घटनेनंतर आरोपी शाहरुख सैफी अंधाराचा फायदा घेत गाडीतून उडी मारून फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते.
दरम्यान, आरोपी शाहरुख सैफी याचं लोकेशन रत्नागिरीत असल्याचं तपास यंत्रणांना समजलं होतं. ट्रेनमधून खाली उडी मारताना त्याला जखम झाली होती. या जखमेवर उपचार करण्यासाठी तो रत्नागिरीतील सिव्हिल रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र तो पूर्ण उपचार घेण्याआधीच रुग्णालयातून पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी रत्नागिरीत शोधमोहीम हाती घेऊन आरोपी शाहरुखच्या मुसक्या आवळल्या. सध्या तो रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आहे.