रक्षाबंधन विशेष : श्रावण महिन्यानंतर अनेक सणवार एकापाठोपाठ येत असतात प्रत्येक सणाला काहीतरी विशेष पदार्थ देखील करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. आज रक्षाबंधन आहे , आणि त्या निमित्ताने घराघरात हमखास नारळीभाताचा बेत आखला जाणार आहे . तर मग आज आपण पाहूयात सोप्या पद्धतीने आणि झटपट नारळीभात कसा बनवावा.
साहित्य : खवलेला नारळ (नारळाचा चव ) , तांदूळ एक वाटी ,गूळ एक वाटी ,वेलची, दालचिनी ,लवंग, तूप ,पाणी ,सुका मेवा
कृती : झटपट नारळी भात बनवण्यासाठी सर्वप्रथम कुकरमध्ये दोन चमचे तूप आणि एक वाटी तांदूळ स्वच्छ धुऊन एक शिट्टी काढून घ्या. आपल्या घरातील सदस्यांच्या अंदाजानुसार प्रमाण कमी जास्त करू शकता .
भात अर्धा शिजून येईपर्यंत कढईमध्ये दोन चमचे तूप घालून त्यावर सर्वप्रथम आवडीनुसार सुकामेवा हलका भाजून घ्या . हा सुकामेवा बाजूला काढून ठेवा . त्यानंतर या तुपामध्ये वेलची दोन ,दालचिनीचा बारीक तुकडा ,दोन लवंगा घाला त्यानंतर यामध्ये नारळाचा चव अर्धी वाटी हलका भाजून घ्या. हलका गुलाबी रंग आल्यानंतर त्यामध्ये एक वाटी गूळ घाला . हे सर्व जिन्नस तुपामध्ये हलके भाजायचे आहेत. यावेळी गॅस मध्यम आचेवर ठेवा . हे दोन्हीही पदार्थ लवकर करपू शकतात . त्यामुळे सातत्याने हलवत रहा.
हे सर्व बनवे पर्यंत कुकर थंड होऊन भात बाहेर काढू शकता . भाताची शीत मोडणार नाहीत अशा हलक्या पद्धतीने त्याला उपसून घेऊन या मिश्रणामध्ये घालून हलक्या हाताने एकत्र करून घ्या . यात अर्धा ग्लास पाणी घालून कढईला झाकण लावून ठेवा .छान वाफ निघाल्यानंतर चांगले परतून घ्या आणि वरतून ड्रायफ्रुटने गार्निश करा. नारळी भात तयार आहे.