GANESH CHATURTHI 2022 : गणपतीच्या दुर्वा वाहतात यामागे एक कथा आहे एका पौराणिक कथेनुसार एकेकाळी यमाच्या दरबारात तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य सुरू होतं. यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच नृत्य थांबवून तिला आपल्या भावना बोलून दाखवल्या. परंतु मध्येच नृत्य थांबवल्याने अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला. अनलासूर असे त्या राक्षसाचे नाव होते आणि त्याच्या डोळ्यांतून अग्नीच्या ज्वाळा भडकत होत्या. तिलोत्तमाचे नृत्य मध्येच थांबवल्यामुळे आता मी तूला खाऊन टाकेन अशा त्याच्या बोल्यावरुन यमधर्म घाबरुन पळून गेला.
( प्रतीकात्मक चित्र )
अनलासुराने तांडव करण्यास सुरु केला. त्याला समोर जे दिसेल ते खात सुटला. अशाने सर्व देव घाबरून विष्णूंना शरण गेले. परंतु अनलासुर तेथेही पोहचला आणि त्याला पाहिल्यावर विष्णूंनीही गणपतीचे स्मरण केले. गणपती बालक रूपात प्रकट झाले आणि स्मरण केल्याचे कारण विचारले. तेव्हा अनलासुराने देवांचे जगणे कठिण केल्याचे दिसून आले परंतु गजानन आपल्याजागी उभे राहिले. अनलासुर जेव्हा गणपतीकडे वळला आणि त्यांना गिळण्यासाठी आपल्या पंज्यांनी उचलू लागला तेच अनलासुराच्या हातातील बाल गणपतीने प्रचंड रूप धारण केले.
( प्रतीकात्मक चित्र )
आभाळापर्यंत भिडलेले विराट रुप बघून अनलासुराला काही सुचेल तोपर्यंत गजाननाने एक क्षणात अनलासुराला सोंडेत पकडले आणि गिळून घेतले. अनलासुराला गिळल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली. गणपतीचा त्रास बघून समस्त देव, ऋषी, मुनी उपचार सुरू केले. परंतु कशाचाही उपयोग होईना. शेवटी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ८८ हजार ऋषीमुनींनी प्रत्येकी २१ दुर्वांची जुडी अशा दुर्वा त्याच्या मस्तकावर ठेवल्या आणि चमत्कार म्हणजे दुर्वांकुर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह शमला. तेव्हापासून गणपतीला दुर्वा प्रिय आहे आणि गणपती पूजनात दुर्वाचे अत्यंत महत्त्व आहे.