पुणे : पुण्यात नाना पेठमध्ये एका तरुणाची भयंकर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. या तरुणावर 35 वेळा चाकूने वार केले , त्यानंतर त्याच्या डोक्यात सिमेंट काँक्रीटचा ब्लॉक घालून त्याची हत्या करण्यात आली आहे . या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे .
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार , नाना पेठत राहणारा तरुण अक्षय वल्लाळ याची पूर्व वैमानस्यातून हत्या करण्यात आली आहे . अक्षय यांची समाजात चांगली प्रतिमा होती . महेश बुरा आणि किशोर शिंदे या दोघांचे अक्षय यांच्यासोबत पूर्वीपासूनचे काही वाद होते .
नाना पेठ येथील नवा वाडा येथील एका लॉन्ड्रीच्या समोर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास अक्षय वल्लाळ हे त्यांचे मित्र अतुल गायकवाड यांच्यासोबत उभे होते. त्यावेळी महेश बुरा आणि किशोर शिंदे तिथे आले , आणि त्यांनी अक्षयवर हल्ला चढवला . चाकूने 35 वार आणि डोक्यात सिमेंट काँक्रीटचा दगड घालून हत्या करण्यात आली .
अतुल गायकवाड हे मध्यस्थीसाठी गेले असता त्यांच्यावर देखील कोयत्याने वार करण्यात आला आहे. यामध्ये गायकवाड देखील गंभीर जखमी झाले आहेत . याप्रकरणी अक्षय वल्लाळ यांचे मित्र अतुल गायकवाड यांनी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे . याप्रकरणी समर्थ पोलिसांनी महेश बुरा आणि किशोर शिंदे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.