गुरुपौर्णिमेनिमित्त पुण्यातील आश्रमात ओशो अनुयायांना प्रवेश नाकारला; अनुयायांचं आंदोलन

265 0

पुणे: गुरुपौर्णिमेनिमित्त समाधीच्या दर्शनासाठी देशातील विविध ठिकाणांहून आलेल्या ओशो अनुयायांना आश्रमात प्रवेश करण्यास मनाई केल्याबद्दल पुण्यातील कोरेगाव पार्क येथील आश्रमाबाहेर बुधवारी आंदोलन करण्यात आलं. ओशोंचे विचार संपवण्याचं विदेशी लोकांचं षडयंत्र असल्याचा आरोप यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आला.

“ओशो यांचा जन्म व मृत्यू स्थळ तसेच समाधी भारतात आहे मात्र ओशोंची बौद्धिक संपदा, पुस्तके, ध्वनिफिती, दृकश्राव्य फिती, ट्रस्टची मालमत्ता या सर्वांचे मान्यता अधिकार पाश्चिमात्यांकडे आहेत. झुरीच येथे ओशो इंटरनॅशनलचं मुख्यालय नेण्यात आलं असून सगळ्या गोष्टींचा लाभही तिथंच जात आहे. ओशोंचे विचार लोकांपर्यंत पोचू न देता अनुयायांवरही अनेक बंधनं लादण्यात येत आहेत. ओशोंच्या बौद्धिक संपदेवर हक्क सांगत त्या साहित्यातून मिळणारा संपूर्ण पैसा पाश्चिमात्यांकडेच जातोय. भारतीय ओशो आश्रमांना विशेषतः पुण्यातील आश्रमास त्यातून काहीही उत्पन्न मिळत नाही. उलट ते येथील व्यवस्थापनावरही आपलं वर्चस्व दाखवत आहेत. हा तर आश्रमाच्या मालमत्ता विकण्याचा प्रयत्न असून हे सर्व ओशोंचे विचार संपवण्याचं षडयंत्र आहे,” असा आरोप ओशो अनुयायांच्या वतीनं ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनचे माजी विश्वस्त तसेच ‘ओशो वर्ल्ड’ पत्रिकेचे संपादक स्वामी चैतन्य कीर्ती यांनी केला. या पत्रकार परिषदेस स्वामी चैतन्य कीर्ती यांच्यासह पटकथाकार व ओशो अनुयायी कमलेश पांडे, याचिकाकर्ते व माजी विश्वस्त स्वामी प्रेमगीतजी अर्थात योगेश ठक्कर, स्वामी मोक्षजी, स्वामी चेतनारूपजी आदी अनुयायी उपस्थित होते.

माळा घालू नयेत या बंधनाचा आग्रह धरत आज माळधारक अनुयायींना समाधीचं दर्शन घेऊ देण्यात आलं नाही. दर्शन घ्यायचं असेल तर माळ काढावी लागेल, अशी सक्ती करण्यात आल्याचंही अनुयायींनी सांगितलं. आत प्रवेश नाकारल्यानं आश्रमाच्या प्रवेशद्वाराबाहेर अनुयायांनी भर पावसात चार तास आंदोलन केलं.

आधीच ओशो आश्रमाची जागा विकण्यावरून वाद सुरू असताना ओशोंची माळ न घालण्यासाठी अनुयायांवर घालण्यात आलेली बंधनं, ओशो साहित्याचे अधिकार आदी विषय देखील आता चव्हाट्यावर आले आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!