पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीमधून बंड करत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर वारंवार शरद पवार (Sharad Pawar) यांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार यांच्यासह बंड केलेल्या सर्वच नेत्यांनी प्रयत्न केले होते. मात्र यादरम्यान शरद पवार यांनी आक्रमक होत साथ सोडून गेलेल्यांवर जोरदार टीका केली होती. त्यातच आता शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अजित पवार हे आमचेच नेते आहेत असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
“अजित पवार आमचे नेते आहेतच. त्यात काही वादच नाही. फूट पडणं याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी पडते? जर पक्षातलाच एक मोठा वर्ग देश पातळीवर वेगळा झाला तर फूट पडते. आज तशी स्थिती इथे नाही. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लोकशाहीत त्यांचा तो अधिकार आहे. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून त्यावरून लगेच पक्षात फूट पडली म्हणायचं कारण नाही. तो त्यांचा निर्णय आहे,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.