पुणे : स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे कार्य संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे. त्यांचा सन्मान करताना मनात देशाविषयी गौरवाची भावना निर्माण होते, असे प्रतिपादन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.
‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचा एक भाग म्हणून केंद्रीय पंचायतराज आणि सांस्कृतिक मंत्रालयातर्फे आगाखान पॅलेस येथे आयोजित राष्ट्रीय ध्वजारोहण आणि स्वातंत्र्य सैनिक सन्मान सोहळ्याअंतर्गत श्री.पाटील यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील, पंचायतराज मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार विजय कुमार बेहरा, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुरातत्व विभागाचे अधीक्षक डॉ.राजेंद्र यादव, गांधी मेमोरियल सोसायटीच्या नीलम महाजन, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, मुंबईचे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र यादव आदी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात ७५ आठवडे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करणे हा भाग्याचा क्षण आहे. स्वतंत्र भारताला विकासाची दिशा दाखविणारा आणि नव्या पिढीला देशासाठी त्यागाची प्रेरणा देणारा हा कार्यक्रम आहे.
देशात ४०० ठिकाणी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाच्या माध्यमातून देशगौरवाची भावना निर्माण होईल. येणाऱ्या काळात आपल्या देशाला जगात अग्रेसर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.
स्वातंत्र्य लढ्यादरम्यान महात्मा गांधीजींचे आगाखान पॅलेसमध्ये वास्तव्य असल्याने ही वास्तू स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणादायी ठरली. या वास्तूचे संवर्धन करतानाच ही वास्तू देशासाठी देणाऱ्या आगाखान यांच्या आठवणीही पुरातत्व विभागाने जपाव्यात, असे त्यांनी सांगितले