Aapa Renuse Mitra Pariwar

देशाला संविधान देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मोठे गुरु- डॉ. जब्बार पटेल

484 0

पुणे : गुरुपौर्णिमेला तुमच्या गुरुला वंदन करा, परंतु या दिवशी भारतीय संविधानाची आठवण ठेवली पाहिजे कारण देशाला संविधान देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच मोठे गुरु आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ सिने-नाट्य दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले. चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने 18 व्या गुरुजन गौरव समारंभात ते बोलत होते.

या प्रसंगी ज्येष्ठ सिने-नाट्य दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ, ऑल इंडिया जैन कॉन्फरंसचे चेअरमन रमणलाल लुंकड यांना गुरुजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तुकाराम महाराज पगडी, उपरणे, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी चिंतामणी ज्ञानपीठाचे संस्थापक अध्यक्ष अप्पा रेणुसे, युवराज रेणुसे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, उद्योजक अभय मांढरे आदी मान्यवर उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले, ” आपल्या देशाला धर्म स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य प्रदान करणारे संविधान लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थने गुरु आहेत. डॉ. आंबेडकर यांनी देशाला लोकशाहीचा अर्थ शिकवला. गुरुपौर्णिमेला आपण आपल्या गुरूंचे स्मरण करतो. या दिवशी प्रत्येकाने संविधानाची आठवण ठेवली पाहिजे. गुरु सर्व काही शिकवत नसतो. काही गोष्टी शिष्याला स्वतः शिकाव्या लागतात. गुरूकडून काय घ्यायचे ते शिष्याच्या हाती असते. गुरु शिष्याला देत असतो. त्यातून शिष्य आपल्याला जेवढे हवे तेवढे घेतो आणि पुढे जात राहतो. या शिकण्यामधून शिष्याने गुरूच्या पुढे गेले पाहिजे तोच खरा आदर्श शिष्य असतो” अशी भावना डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केली.

डॉ. अरुण अडसूळ म्हणाले, ” औपचारिक शिक्षण देताना शिक्षकाने फक्त शिक्षक न राहता गुरूच्या भूमिकेत गेले पाहिजे. गुरु म्हणजे जो फक्त माहिती देत नाही किंवा ज्ञान देत नाही तर जो विद्या देतो तोच गुरु. विद्या म्हणजे सत्य-असत्य, नीती-अनीती, धर्म-अधर्म यामधील फरक समजावून सांगणे. या सत्कारामुळे आम्हाला पुन्हा नवीन कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे अशी भावना डॉ. अडसूळ यांनी व्यक्त केली.

उल्हास पवार म्हणाले की प्रत्येक क्षणाला काहीतरी शिकत काहीतरी शिकत राहा. प्रत्येक माणसांकडून शिकण्यासारखे आहे. आयुष्यभर शिष्याच्या भूमिकेत राहिलात तरच तुम्ही गुरुस्थानी पोहोचाल

अप्पा रेणुसे यांनी आपल्या प्रास्ताविकात गुरुजन गौरव समारंभ साजरा करण्यामागील उद्देश सांगितला. अप्पा रेणुसे म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस एकमेकांपासून दूर झाला आहे, संवाद कमी झाला आहे. त्यामुळे जुने संस्कार, जुनी संस्कृती नव्या पिढीपुढे आली पाहिजे या उद्देशाने गुरुजन गौरव सोहळा मागील 18 वर्षांपासून साजरा केला जात असल्याचे सांगितले. या समारंभाच्या निमित्ताने अनेक ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचे विचार ऐकण्याची संधी मिळाली, अनेकांचा सहवास लाभल्याचे अप्पा रेणुसे म्हणाले.

यावेळी रमणलाल लुंकड यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर आभार सचिन डिंबळे यांनी मानले. वेदश्री देशमुख यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!