पुणे : ‘पुस्तकाच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट समोर आणता किंवा समाजमाध्यमांवर जेव्हा लिहिता, तेव्हा त्याची नैतिक जबाबदारी घेणे आणि ते शब्द समाजात रुजवणे, ही आजच्या काळाची गरज आहे, अशा शब्दरचनाकारांची आज गरज आहे,’ असे प्रतिपादन खासदार व सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
वरिष्ठ पत्रकार व कवी उत्तमकुमार इंदोरे यांनी लिहिलेल्या ‘पोएम म्हंजी काय रं?’ या पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन शनिवारी डॉ. कोल्हे, महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य संपादक पराग करंदीकर, शिवसेनेचे जिल्हा संघटक अॅड. अविनाश रहाणे यांच्या हस्ते व सुप्रसिद्ध लेखक नितीन थोरात, पत्रकार किरण वाजगे, प्रकाशक विनोद शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी डॉ. कोल्हे बोलत होते.
डॉ. कोल्हे म्हणाले, ‘समाजावर प्रहार करणाऱ्या, चुकीच्या गोष्टींना विरोध करणाऱ्या लेखणीची आज गरज आहे. समाजाला मी काही देणं लागतो, माझ्या वाट्याला आलेला संघर्ष इतर कुणाच्या वाट्याला येऊ नये, असं मानणाऱ्या माणसांची आज गरज आहे. त्यामुळे अशा काळात ‘पोएम म्हंजी काय रं?’ हा कवितासंग्रह निश्चितच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल. कारण यातील कविता काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या असल्या, तरी त्या आजच्या काळातही तितक्याच समर्पक आहेत.’
करंदीकर म्हणाले, ‘आज कुणीही कुणाविरोधात बोलायला तयार नाही. सर्वजण गोड गोड बोलण्यात धन्यता मानत आहेत. अशा समाजाला मधुमेह झाला आहे काय, अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. अशा काळात रोखठोक मते मांडणारे साहित्य येणे ही काळाची गरज आहे. त्या कसोटीवर या कवितासंग्रहातील कविता खऱ्या उतरतील, यात शंका नाही.’
रहाणे यांनीही समाजातील बदलती पत्रकारिता आणि राजकारण यावर भाष्य करताना पत्रकारितेत सडेतोड लिखाणाची अपेक्षा व्यक्त केली. नितीन थोरात यांनी उत्तमकुमार इंदोरे यांची खुमासदार मुलाखत घेतली. तिला रसिकांबरोबरच मान्यवरांनीही दिलखुलास दाद दिली. उत्तमकुमार यांच्या जीवनावर आधारित सुवर्णा इंदोरे यांनी तयार केलेला माहितीपटही याप्रसंगी दाखविण्यात आला. त्यानंतर या पुस्तकातील काही कवितांचे सादरीकरण तुषार डावखर, स्वाती मांडे, अश्विनी फलके व पूजा आवटे यांनी केले. चैत्राली इंदोरे यांनी प्रास्ताविक केले, तर मोहन नंदकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.