पुणे

‘उज्वल भारत, उज्वल भविष्य’ कार्यक्रम आयोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

पुणे : भारत सरकारचा ऊर्जा, नवी व नवीकरणीय ऊर्जा विभाग आणि अधिनस्त सार्वजनिक उपक्रम तसेच राज्य शासन यांच्या सहभागातून २५ ते ३१ जुलैदरम्यान ‘उज्वल भारत, उज्वल भविष्य’ कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. याबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली.                                                                                     ऊर्जा विभागाने मागील ८ वर्षात केलेल्या उल्लेखनीय कामे दर्शवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. देशातील सर्व ७७३ जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात दोन ठिकाणे निश्चित करुन हा कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार पानशेत आणि भोरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.                                                                       बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, या उपक्रमासाठीचे नोडल अधिकारी तथा महावितरणच्या पुणे ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता आर. व्ही. पवार, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक एच. लल्लियनसियामा, महावितरणच्या बारामती मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, महाऊर्जाचे व्यवस्थापक अमित चिलवे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे यांच्यासह महावितरणचे अधिकारी, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.