पुणे : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन दिवसेंदिवस अधिक आक्रमक होताना दिसत आहे. काही ठिकाणी या आंदोलनाने मोठ्या प्रमाणात हिंसक वळण घेतले आहे. मोठ्या प्रमाणात गाड्यांची जाळपोळ केली जात आहे. काही नेत्यांची घरे, कार्यालये जाळली जात आहेत. याचे पडसाद पुण्यातदेखील पाहायला मिळाले. पुण्यातील नवले पुलावर काल दुपारी मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करत काही तरुणांकडून आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनावेळी मुंबई-बेंगलोर महामार्गावर टायर जाळण्यात आली होते. आता या प्रकरणात पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या जाळपोळ प्रकरणात 400 ते 500 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून गर्दी जमा केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 336 आणि कलम 441 अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत.