पुणे : आम्ही 2018 ते 2022 पर्यंतचे संशोधक विद्यार्थी सांगू इच्छितो की, अनु.जाती तील विद्यार्थ्यांना संशोधन कार्य करण्यासाठी बार्टी संस्थेने 2013 पासून अधिछात्रवृत्तिची UGC व NFSC च्या नियमानुसार योजना सुरू केली. त्याचा फायदा अनु.जाती तील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करण्यास मदत होत आहे.
बार्टी संस्था स्वायत्त संस्था असून देखील स्वतंत्र निर्णय घेऊ शकत नाही असे लक्षात येते. तसेच सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव यांच्या म्हणण्या नुसारच विद्यार्थी हित लक्षात न घेता वागतात, ही चुकीची बाब आहे. कारण बार्टी संस्थेने 2018 ते 2022 पर्यंतच्या संशोधक विद्यार्थ्याना UGC, NFSC, सारथी व महाज्योती च्या नियमानुसार आधिछात्रवृत्ति देणे अपेक्षित होते.परंतु तसे न करता अनु.जाती तील संशोधक विद्यार्थ्यावर अन्याय करणारी भूमिका बार्टी संस्था घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. ते खालील प्रमाणे…
1) BANRF 2018 बॅचेच्या Ph.D करणाऱ्या 214 संशोधक विद्यार्थ्यांना UGC व NFSC च्या नियमानुसार 5 वर्ष अधिछात्रवृत्ती मिळणे अपेक्षित असताना त्यांना फक्त 03 (तीन) वर्ष अधिछात्रवृत्ति देण्याचा पवित्रा बार्टी घेत आहे. ह्या बॅचेच्या संशोधकांची मागणी अशी आहे की, UGC व NFSC च्या नियमानुसार आणि Covide-19 व Lockdown या गोष्टींचा विचार करून (2+3) एकूण 5 वर्ष आधिछात्रवृत्ति मिळावी जी नियमात आहे.
2) BANRF 2018 च्या एमफील करणाऱ्या 194 विद्यार्थ्यांना UGC नियमानुसार एमफील ते पीएचडी कंटिन्युएशन मिळणं आवश्यक आहे परंतु 32 व्या नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय होऊन सुद्धा विद्यार्थ्यांना आज पर्यंत न्याय मिळाला नाही.
3) BANRF 2019-20 बॅचच्या Ph.D संशोधक विद्यार्थ्यांना UGC व NFSC च्या नियमानुसार 5 वर्षे फेलोशिप दिली जाते. पण त्याच बॅचच्या एमफील करणाऱ्या १७० संशोधकांना एमफील ते पीएचडी कंटिन्युएशनसाठी UGC चा नियम लागू करत नाही.
4) BANRF 2021 च्या बॅचला सरसकट 861 विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला पण UGC च्या नियमाला डावलून रजिस्ट्रेशन डेट पासून अधिछात्रवृत्ति न देण्याचा निर्णय घेण्यात येतो. तसेच दोन वर्ष उलटून गेली तरी देखील अद्याप एकही रुपया संशोधक विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जात नाही.
5) BANRF 2022 च्या एकूण 833 संशोधक विद्यार्थ्यांना सारथी व महाज्योती नियमाप्रमाणे सरसकट फेलोशिप देणे आवश्यक आहे. परंतु बार्टी सकारात्मक भूमिका घेत नसलेलं दिसते. हे अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांवर खूप मोठा अन्याय होत असलेलंही दिसते.एकीकडे सारथी, महाज्योती सारख्या संस्थेतील मागण्या लगेच मान्य होतात, तर दुसरीकडे अनु.जाती तील संशोधकांना नियमात असताना देखील अन्याय सहन करावा लागतो. तसेच आंदोलने, उपोषणे व जलसमाधी आंदोलने वारंवार करण्याची वेळ येते. प्रत्येक बॅचमधील विद्यार्थ्यांना न्याय व हक्कासाठी संघर्ष का करावा लागतो. यासंदर्भात बार्टी प्रशासनानं गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. शेतकरी, हातमजूर, वीटभट्टी इ. रोजगारावर मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील बरेच संशोधक विद्यार्थी आहेत व शिक्षण घेत असतात. त्यांचे संशोधन उत्तमरीत्या पूर्ण करण्यासाठी बार्टी संस्था आधिछात्रवृत्ति प्रधान करते. परंतु यामध्ये विद्यार्थ्यांच्या मागास असणाऱ्या परिस्थितीचा विचार न करता बार्टी प्रशासन सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव यांच्या मर्जीनुसार निर्णय घेते. जे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. विद्यार्थ्यांच्या संशोधनामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, त्यांचे संशोधन उत्तमरीत्या पूर्ण होईल. या अनुषंगाने बार्टी संस्थेने सकारात्मक भूमिका घेणे अत्यावश्यक आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे कागदपत्रे बार्टी संस्थेस प्राप्त झाली आहेत. त्यांची अधिछात्रवृत्ति विद्यार्थ्यांच्या अकाउंट वरती जमा करण्यासाठी बराच कालावधी का लागतो; हे देखील संशोधनामध्ये अडथळा निर्माण केल्यासारखेच आहे.
हे सर्व करत असताना विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाणार नाही, याचीही गांभीर्याने बार्टी प्रशासनाने दखल घ्यावी. व संशोधन पूर्ण करण्यास विलंब झाला तर याला पूर्ण पणे बार्टी प्रशासन जबाबदार राहील. असेही संशोधक विद्यार्थ्यांनी सांगितले. BANRF 2018 ते BANRF 2022 पर्यंतची सर्व संशोधक विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन संघर्ष करण्याची तयारी दर्शवली आहे.
सर्व संशोधक विद्यार्थ्यांना त्वरित न्याय न भेटल्यास आक्रोश आंदोलन करू असे संशोधक विद्यार्थी, सिद्धनाथ गाडे, प्रफल्ल कांबळे, प्रतिभा थोरात, अनिल करेकांबळे, छाया बनसोडे, ईश्वर अडसूळ, शरद डूमणे, संविधान दुगाने, राहुल बनसोडे, प्रवीण कांबळे, प्रकाश पटेकर, नारायण खरात अधिक इ. संशोधक विद्यार्थ्यांनी सांगितले.