नागपूर : शिवसेनेतील बंडा नंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर शिवसेनेसोबत महाआघाडीच्या रूपात सत्तेत सहभागी झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला देखील सत्तेवर पाणी सोडावे लागले.
शिवसेनेला पुन्हा एकदा बळकटी आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तलवार उपसली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे. तर ‘आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढायला हवं’ असे वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट नागपुरातून केले आहे.
“महाविकास आघाडी विषयी काँग्रेस सोबत देखील चर्चा करायला हवी,असे म्हणून शरद पवार यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रातील निवडणुका एकत्रित लढवल्या तर लोकांना जो हवा आहे तशा प्रकारचा निर्णय घेण्याची संधी मिळेल,त्यामुळे आम्ही सर्वपक्षीय पातळीवर चर्चा केली नाही,माझं मत तेच आहे. यासंदर्भात काँग्रेस सोबत चर्चा करावी लागेल. तसेच शिवसेनेसोबत देखील बोलावं लागेल. त्यांचं मत ते असलं तर चर्चा केली जाईल. या प्रश्नावर आम्ही तिघेही एकत्र बसू यात शक्य झालं तर एकत्र निर्णय घेऊ” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.
त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडी दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.