जालना : जालना येथे जाण्याच्या अगोदर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पदाधिकारी मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. या मेळाव्यात त्यांनी (Uddhav Thackeray) राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली. त्यांनी जालना या ठिकाणी घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात गेल्या चार दिवसापांसून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात उपोषण सुरु होतं. मात्र, शुक्रवारी (01 सप्टेंबर) पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये झालेल्या वादानंतर दगडफेक आणि लाठीचार्ज करण्यात आला. दरम्यान आता या घटनेचे पडसाद राज्यभरात ठिकठिकाणी उमटताना पाहायला मिळत आहेत.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर आता याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहे. शरद पवार यांच्यानंतर आता माजी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील जालना येथे जाणार असून, आंदोलकांची भेट घेणार असल्याचे समोर येत आहे. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे जालन्यात जाणार आहेत.
ज्या ठिकाणी ही सर्व घटना घडली त्या अंतरवाली सराटी गावात सुरु असलेल्या आंदोलनास्थळी अनेक राजकीय नेतेमंडळी देखील भेटीसाठी जाताना पाहायला मिळत आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे आज या गावात जाणार आहेत. उद्धव ठाकरे हे आंदोलकांची भेट घेतल्यावर अंबड येथील जखमी गावकऱ्यांची भेट घेऊन विचारपूस करणार आहेत.