ऊर्जामंत्र्यांसोबतची आजची बैठक रद्द झाल्यानं वीज कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता
एकीकडे एसटीच्या संपामुळे राज्यातल्या ग्रामीण भागांना फटका पडत आहे. त्यात आता आणखी एका संपाचं संकट राज्यावर उभं ठाकलंय.
मात्र यावेळी हे संकट केवळ शहरी भागही कवेत घेण्याची शक्यता आहे. कारण वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुढच्या 2 ते 3 दिवसांत महाराष्ट्र अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण काल (सोमवारी) सुरू झालेला वीज कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी ऊर्जामंत्र्यांसोबत मुंबईत काल बैठक झाली.
पण ती बैठक निष्फळ ठरली आहे. शिवाय आज (मंगळवारी) ऊर्जामंत्र्यांसोबत होणारी बैठकही रद्द करण्यात आली आहे.
वीज निर्मिती आणि कोळसा पुरवठा करणाऱ्या अनेक केंद्रांवरच्या संघटनांनी संप पुकारल्यानं विजेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोयना धरणाचं पायथा विद्युतगृह बंद पडलं आहे. त्यामुळं संपावर तोडगा न निघाल्यास वीजटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
