मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेच्या लोकसभा खासदार आणि राज्यसभेच्या खासदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये काही खासदार अनुपस्थित असल्यामुळे शिवसेनेमध्ये पुन्हा नवीन खलबती होत असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
दरम्यान बैठक पूर्ण झाल्यानंतर लोकसभा खासदार गजानन कीर्तिकर यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पत्रकारांशी बोलताना गजानन कीर्तिकर म्हणाले की,आजच्या शिवसेनेच्या बैठकीसाठी ४ खासदार अनुपस्थित होते. यामध्ये एक भावना गवळी आणि श्रीकांत शिंदे हे गैरहजर होते. तर संजय जाधव आणि एक खासदार आजारपणामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
यासह आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार आहेत. राष्ट्रपतीपदाची निवडणूक राजकीय नाही. त्यामुळे आम्ही सर्व खासदारांनी त्यांना पाठिंबा द्यावा,अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानुसार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपला निर्णय घोषित करतील असे गजानन कीर्तीकर यांनी सांगितले आहे.
तर आमदार अंबादास दानवे यांनी “ही बैठक नसून शिवसेनाप्रमुखांना आम्ही भेटायला गेलो होतो.90% लोक शिवसेनेसोबतच आहेत. काही लोकांनी गद्दारी केली आहे. मात्र आम्ही शिवसेनेसोबत आहोत.” हेच सांगायला आज मातोश्रीवर आलो होतो. सर्व खासदार बैठकीत आहेत. योग्य ती भूमिका लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मांडतील असे आमदार अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
