“अभी एक फॅशन हो गया है… आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर… इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जनम तक स्वर्ग मिल जाता…”
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी हे असं वादग्रस्त वक्तव्य केलं आणि या त्यांच्या वक्तव्यावरून सर्वत्र एकच गहजब झाला. काँग्रेससह विरोधकांनी अमित शाह यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागावी म्हणून लोकसभा आणि राज्यसभा अक्षरशः दणाणून सोडली. संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी, कॉंग्रेसनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव केल्याचा आरोप केला आणि या आगीत तेल ओतण्याचं काम केलं. आता प्रश्न हा उरतो की, डॉ. आंबेडकरांचा दोनदा पराभव कसा झाला? आणि तो कुणी केला? या प्रश्नांच्या उत्तरांचा हा धांडोळा…
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951 मध्ये पहिली लोकसभा निवडणूक पार पडली. ही निवडणूक प्रक्रिया 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 अशी सुमारे 04 महिने चालली. निवडणूक जाहीर होताच आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणि इतर काही मुद्द्यांवरून केंद्रीय कायदेमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि निवडणुकीच्या तयारीला लागले. आंबेडकरांनी आपल्या शेड्युल कास्ट फेडरेशन या राजकीय पक्षातर्फे 35 जागा लढवल्या. त्यातलेच एक उमेदवार म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
उत्तर मुंबईतून डॉ. आंबेडकर निवडणूक रिंगणात!
देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत 489 जागांसाठी 53 राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात उतरले. आंबेडकरांनी समाजवादी पक्षासोबत युती केली आणि देशाची पहिली निवडणूक लढवली. प्रत्येक द्विसदस्यीय मतदारसंघातून सर्वसाधारण व राखीव अशा दोन्ही जागांवरून लोकसभा प्रतिनिधी निवडून द्यायचे होते. मुंबई उत्तर मतदारसंघातून सर्वसाधारण जागेसाठी काँग्रेसचे विठ्ठल गांधी विरूद्ध समाजवादी पक्षाचे अशोक मेहता, तर राखीव जागेसाठी काँग्रेसचे नारायण काजरोळकर विरूद्ध शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी लढत ठरली. शिवाय कम्युनिस्ट पक्षाकडून श्रीपाद अमृत डांगे, अखिल भारतीय राम राज्य परिषदेकडून केशव जोशी, तर हिंदुत्त्ववादी नेते गोपाळराव देशमुख आणि निळकंठ परूळेकर या दोन अपक्षांनी देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवली. अर्थात, यात सर्वाधिक चर्चा झाली ती बाबासाहेब आंबेडकर विरूद्ध काँग्रेसचे उमेदवार नारायण काजरोळकर यांच्यातल्या लढतीची.
मुंबई उत्तर मतदारसंघ लोकसभा निवडणूक निकाल (1951-52)
उमेदवार पक्ष मिळालेली मतं
विठ्ठल गांधी काँग्रेस 149138
अशोक मेहता समाजवादी 139741
*नारायण काजरोळकर काँग्रेस 138137*
*भीमराव आंबेडकर शेकाफे 123576*
श्रीपाद डांगे कम्युनिस्ट 96755
गोपाळ देशमुख अपक्ष 40786
केशव जोशी रामराज्य 15195
निळकंठ परूळेकर अपक्ष 12560
डॉ. आंबेडकर 14 हजार 561 मतांनी पराभूत
या निवडणुकीत काँग्रेसच्या नारायण काजरोळकरांना 1 लाख 38 हजार 137 मतं, तर बाबासाहेब आंबेडकरांना 1 लाख 23 हजार 576 मतं मिळाली आणि आंबेडकरांचा 14 हजार 561 मतांनी पराभव झाला. खरं तर आंबेडकारांचा पराभव हा देशासाठी एक धक्का होता. आंबेडकरांचा पराभव कसा झाला? कुणी केला? यावर चर्चा सुरू झाल्या ज्या आजही सुरूच आहेत. काँग्रेसनं आंबेडकरांविरोधात ठरवून उमेदवार देऊन त्यांचा पराभव केल्याचा आरोप काँग्रेसवर आजही केला जातो. काँग्रेसनं आंबेडकरांविरोधात उमेदवारच का दिला? यामागं काय कारण होतं?
… म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला!
सदोबा पाटील अर्थात, स. का. पाटील हे मुंबई काँग्रेसचे एकेकाळचे सर्वेसर्वा! तेव्हाच्या बॉम्बे काँग्रेस कमिटी अंतर्गत येणाऱ्या मतदारसंघात त्यांचा शब्द हा अंतिम मानला जायचा. “बाबासाहेब मुंबईतील राखीव जागा लढवणार असतील तर काँग्रेस त्यांना विरोध करणार नाही,” असं स. का. पाटलांनी निवडणूक घोषित होण्यापूर्वी जाहीर करून टाकलं होतं. मग, असं असताना देखील काँग्रेसनं नारायण काजरोळकरांच्या रूपानं आंबेडकरांच्याविरोधात उमेदवार का दिला? स. का. पाटलांच्या मनात आंबेडकरांबद्दल आदर होता मात्र समाजवादी आणि कम्युनिस्टांबद्दल प्रचंड राग होता. आंबेडकरांची शेड्युल्ड कास्ट फेडरेशन आणि समाजवादी पक्ष यांच्यात युती झाल्याचं समजताच स. का. पाटलांना राग अनावर झाला आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध काँग्रेसतर्फे नारायणराव काजरोळकर यांचं नाव जाहीर केलं.” जसा काँग्रेसमुळं आंबेडकरांचा पराभव झाल्याचं मानणारा एक वर्ग आहे, तसाच तो कम्युनिस्टांमुळं आंबेडकरांचा पराभव झाल्याचं मानणाराही एक वर्ग आहे. आंबेडकर उभे असलेल्या राखीव जागेवर कुणीही मत देऊ नये, असा प्रचार कम्युनिस्टांनी केला आणि त्याचा फायदा काजरोळकरांना झाला. या निवडणुकीतील आंबेडकरांच्या पराभवाची आणखी काही कारणं सांगितली जातात. कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद डांगे यांचं या निवडणुकीतलं चिन्ह होतं इंजिन! ‘हे चिन्ह असलेल्या उमेदवाराच्या मतपेटीत दोन्ही मतपत्रिका टाका,’ असं आवाहन डांगे यांनी तसेच त्यांच्या पाठीराख्यांनी निवडणूक मोहिमेतील प्रचारसभांमध्ये आणि तेव्हा वितरित केलेल्या पत्रकांमध्ये केलं होतं, असं सांगण्यात येतं. मात्र, असं केल्यानं मतं बाद होतात याची कल्पना मतदारांना देण्यात आली नव्हती. दुसरीकडं, याच निवडणुकीत अपक्ष उभे राहिलेले आणखी एक उमेदवार गोपाळराव देशमुख यांनी तर ‘सवर्ण हिंदू मतदारांनी राखीव जागा लढवणाऱ्या डॉ. आंबेडकरांना दोन्हीपैकी एकही मत न देता दोन्ही मतपत्रिका अन्य उमेदवाराच्या मतपेटीत टाकून आपलं एक मत कुजवावं म्हणजे ते बाद होईल,’ अशी व्यवस्था करण्याची सूचना केली होती, असंही म्हटलं जातं. डॉ. आंबेडकरांना नारायण काजरोळकरांपेक्षा 14 हजार 561 मतं कमी पडली. डांगे यांच्या बाद मतांची संख्या 39 हजार 175 इतकी होती. एक मत कुजवा, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं नसतं, तर डॉ. आंबेडकर निवडून आले असते हे या आकडेवारीवरून उघडपणे दिसून येतं. द्विसदस्यीय मतदारसंघात प्रत्येक मतदाराला दोन मतं देण्याचा अधिकार होता. मतदारानं दोन्ही मतं विभागलीच पाहिजेत असं काही कायदेशीर बंधन नव्हतं पण मतदाराला देण्यात येणाऱ्या दोन्ही मतपत्रिका त्यानं एकाच उमेदवाराच्या बाजूनं टाकल्या, तर 1951 च्या लोकप्रतिनिधी कायद्यातील 63 (1) भागातील तरतुदीनुसार अशा मतपत्रिका मतमोजणी करताना बाद ठरवल्या जात होत्या. याच गोष्टीचा फायदा अन्य उमेदवारांनी उठवला आणि आंबेडकरांचा पराभव झाला. याचाच अर्थ, आंबेडकरांच्या पराभवाला केवळ काँग्रेसच नव्हे तर कम्युनिस्ट पक्ष आणि इतर घटकही तितकेच जबाबदार होते, असंच म्हणावं लागेल. आंबेडकरांच्या या धक्कादायक पराभवाची पुढं बराच काळ चर्चा होत राहिली. आंबेडकरांनी मात्र कुणालाही दोष न देता, ‘निवडणूक म्हणजे एक क्रिकेटचा सामना असतो. पराभूत संघ स्वस्थ बसत नाही, तर तो पुढील सामन्याच्या तयारीला लागतो,’ असं म्हणत राज्यसभेवर गेले. मात्र, लोकसभेत जाण्याची त्यांची इच्छा काही दडून राहिली नाही. आता 1954 मध्ये भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत आंबेडकरांचा पराभव का झाला याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू.
‘मी पराभूत झालो तरी चालेल पण…’
भंडारा मतदारसंघातून सर्वसाधारण आणि राखीव अशा दोन्ही जागांवरून लोकसभा प्रतिनिधी निवडून द्यायचे होते. 1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत या मतदारसंघातून सर्वसाधारण आणि राखीव मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार निवडून आले होते. सर्वसाधारण जागेवरून चतुर्भुजभाई जसानी, तर राखीव जागेवरून खांडेकर नावाचे उमेदवार खासदार झाले होते. मात्र, या निवडणुकीत पराभूत झालेल्या एका उमेदवारानं जसानी यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली आणि मार्च 1954 मध्ये तिचा निकाल लागला तो जसानी यांच्या विरोधात! अखेर जसानी यांना राजीनामा द्यावा लागला आणि राखीव जागेवर निवडून आलेल्या खांडेकरांनाही पायउतार व्हावं लागलं. त्यामुळं या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक लागली. उत्तर मुंबईतून बाबासाहेबांसोबत पराभूत झालेल्या अशोक मेहता यांना प्रजा समाजवादी पक्षानं भंडारा पोटनिवडणुकीत सर्वसाधारण जागेवर आपला उमेदवार म्हणून जाहीर केलं, तर राखीव मतदारसंघातून शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे उमेदवार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले. या पोटनिवडणुकीत सर्वसाधारण जागेवर काँग्रेस पक्षाचे पूनमचंद राका विरूद्ध प्रजा समाजवादी पक्षाचे अशोक मेहता अशी, तर राखीव जागेवर काँग्रेसचे भाऊराव बोरकर विरूद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी लढत ठरली. या निवडणुकीत दिनकरराव रहाटे या स्थानिक कार्यकर्त्यानं बाबासाहेबांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. बाबासाहेब आंबेडकर प्रचारासाठी भंडाऱ्यात पोचल्यावर प्रजा समाजवादी पक्षाचे उमेदवार अशोक मेहता यांचे पीए डॉ. शांतीलाल आणि प्रचार प्रमुख अॅड. ज्वालाप्रसाद दुबे या दोघांनी बाबासाहेबांची भेट घेऊन मुंबईप्रमाणेच या पोटनिवडणुकीतसुद्धा एकमेकांना मदत करण्याची भूमिका मांडली. आंबेडकरांनी ही भूमिका मान्य केली आणि त्यांना सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर बाबासाहेबांनी भास्करराव निनावे, दिनकरराव रहाटे आणि इतर कार्यकर्त्यांशी याबाबत चर्चा केली. मात्र, या कार्यकर्त्यांनी प्रजा समाजवादी पक्षासोबत आपण सहकार्याची भूमिका घेऊ नये, असं सुचवलं. आपल्या मतदारांचं दुसरं मत सर्वसाधारण जागेवर उभ्या असलेल्या प्रजा समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला मिळेल, पण त्या पक्षाच्या मतदारांचं दुसरं मत आपल्याला मिळण्याची शक्यता नाही, असा विचार या कार्यकर्त्यांनी मांडला आणि त्याऐवजी आपल्या पक्षाच्या मतदारांनी आपलं दुसरं मत गोठवून टाकावं. ते त्यांनी कुणालाही देऊ नये,’ असा प्रस्ताव मांडला. मात्र, ‘मी राज्यघटना बनवली आहे. मत गोठवणं हे घटनाविरोधी कृत्य आहे. मी निवडणुकीत पराभूत झालो तरी चालेल, परंतु तुमच्या म्हणण्यानुसार वागणार नाही,’ असं म्हणत आंबेडकरांनी कार्यकर्त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला. पुढं हाच विचार त्यांनी एका जाहीर सभेत बोलून दाखवला आणि एक मत सर्वसाधारण जागेवरील अशोक मेहतांना तर दुसरं मत आपल्याला देण्याचं आवाहन केलं. बाबासाहेबांचा हाच विचार विरोधी उमेदवाराच्या पथ्यावर पडला आणि भंडारा पोटनिवडणुकीत आंबेडकर पराभूत होण्याला हे एक कारण ठरलं. या निवडणुकीत काँग्रेसचे भाऊराव बोरकर यांचा विजय झाला, तर आंबेडकरांचा 8381 मतांनी पराभव झाला. आंबेडकरांचा पराभव झाला खरा, पण त्यांच्या प्रभावानं प्रजा समाजवादी पक्षाचे अशोक मेहता यांचा मात्र विजय झाला. संसदीय मार्गाशिवाय अन्य कोणत्याही मार्गानं विजयी होणं आंबेडकरांना मान्य नव्हतं. त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेला मतं कुजवण्याचा सल्ला त्यांना बिल्कुल मान्य नव्हता.
… म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अपराजित!
‘आंबेडकरांच्या नावाऐवजी इतक्या वेळा देवाचं नाव घेतलं असतं, तर सात जन्म स्वर्ग मिळाला असता,’ असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या याच अमित शाह यांनी 2024 च्या भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना,’1954 च्या भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत आंबेडकरांचा पराभव व्हावा म्हणून काँग्रेसकडून एक रूपया आणि मिठाच्या पुड्या वाटण्यात आल्या होत्या,’ असा आरोप केला होता. एकूणच काय, तर काही असंसदीय गोष्टी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एखाद-दुसऱ्या निवडणुकीत पराभव करण्यात काही घटक यशस्वी झाले असतील पण ही यशापयशाची मोजपट्टी वापरून आंबेडकरांचं कर्तृत्त्व मोजता येणं कुणालाही शक्य नाही. ‘मी एकवेळ पराभूत झालो तरी चालेल पण असंसदीय मार्गानं विजयी होणं मला मान्य नाही, या आंबेडकरांच्या नितीमत्तेला पराभूत करण्याची हिंमत कालही कुणाच्यात नव्हती आणि आजही कुणाच्यात नाही. म्हणून तर महामानव विश्वरत्न भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर अपराजित ठरतात!