20 जून… शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी याच दिवशी आपल्या पक्षाविरुद्ध बंड पुकारलं आणि एकेक करत सेनेचे 40 आमदार ठाकरेंच्या हातातून निसटले. आमदारांची ही ‘निसटा’ यात्रा 11 दिवसांनी संपली. मुंबई-सुरत-गुवाहाटी-गोवा-मुंबई अशी भ्रमणयात्रा करत हे आमदार परतले ते एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदी बसवूनच ! शिंदेंच्या या ‘निसटा’ यात्रेनं शिवसैनिकांची निष्ठा मात्र पणाला लागली आणि या ‘निसटा’ यात्रेला चाप लावण्यासाठी ठाकरेंची ‘निष्ठा’ यात्रा सुरू झाली…
………………………………..
‘निसट्या’ आमदारांच्या पावलांवर नगरसेवकांची पावलं !
शिंदे गटानं आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे नगरसेवकही फोडायला सुरुवात केलीये. आधी ठाणे, नंतर नवी मुंबई आणि आता कल्याण-डोंबिवलीतील नगरसेवक देखील शिंदे गटाला जाऊन मिळालेत. एकामागून एक असे शिवसेनेचे निष्ठावान सैनिक निसटत चालल्याचं पाहून आदित्य ठाकरेंनी आता पक्ष वाचवायला सुरुवात केलीये. पक्षातील गळती रोखण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे दंड थोपटून बंड करणाऱ्यांविरुद्ध मैदानात उतरलेत. बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी आदित्य ठाकरे स्वत: राज्यभर फिरून शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.
………………………………..
आधी ‘शिवबंधन’, नंतर ‘प्रतिज्ञापत्र’ आणि आता ‘निष्ठा’ यात्रा
‘निष्ठा’ यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेची संघटना पुन्हा बळकट करण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करणार आहेत. या ‘निष्ठा यात्रेत’ ते बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांचाही दौरा करणार आहेत. मुंबई महानगरपालिका हे त्यांचं मुख्य लक्ष्य असणार यात शंका नाही. मुंबईतील 236 शाखांना ते भेट देणार आहेत.
………………………..
उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे या पिता-पुत्रास राज्य कारभार चालवताना आपल्या पक्षासाठी वेळ देता आला नाही, असं जर का मानलं आणि पक्ष फुटण्याच्या हालचाली सुरू असताना जो वेळ त्यावेळी देता आला नाही तो वेळ जर आता दिला तर पक्षही टिकेल आणि वाढीसही लागेल. आता या पिता-पुत्राचे कष्ट आणि शिवसैनिकांची निष्ठा सेनेला वाचवू शकेल. असो, देर आए लेकिन दुरुस्त आए…
– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक
TOP NEWS मराठी