मुंबई- मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र या निर्णयाचा विरोध करताना खासदार संभाजी छत्रपतींनी ‘मागासवर्ग आयोग असतानाच दुसरा आयोग कशाला ?’ असा सवाल केला.
खासदार संभाजी छत्रपती यांनी आजपासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी मीडियाने त्यांना नव्या मागासवर्ग आयोगबाबत विचारणा केली असता संभाजी छत्रपती यांनी या आयोगाला विरोध दर्शविला. एक मागासवर्गीय आयोग असताना, मराठा समाजासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची कायद्यात घटनेत तरतूद नाही. उगाच समाजाची दिशाभूल करू नये, अशा शब्दात संभाजी छत्रपती यांनी सरकारला ठणकावले.
छत्रपतींना धमक्या ?
‘मला धमक्या आल्या तर मला काहीच करावं लागणार नाही. माझा फक्त छत्रपती घराण्यात जन्म झाला आहे. कोट्यवधी पाईक आहेत की’, असा सूचक इशारा खासदार संभाजी छत्रपती यांनी धमक्या देणाऱ्यांना दिला आहे. संभाजी छत्रपती यांनी मराठा समाजाच्या उन्नतीसाठीच्या सात मागण्या मंजूर व्हाव्यात म्हणून आजपासून उपोषण सुरू केलं आहे. त्यावेळी त्यांना आलेल्या धमक्यांबाबत विचारले असता संभाजीराजेंनी आश्चर्य व्यक्त केलं. तसेच धमक्या देणाऱ्यांना सूचक इशाराही दिला आहे.
मी महाराजांचा वंशज आहे. हा लढा मी लढायलाच हवा. हा माझा निर्णय आहे. अनेक आंदोलने केली. सरकारकडे मागण्या दिल्या. पण सरकारने शब्द पाळला नाही. शब्द न पाळल्याने मला दुसरा पर्याय राहिला नाही. मी जी चळवळ सुरू केली. त्यात समाज वेठीस धरला जाऊ नये म्हणून मी आमरण उपोषण सुरू केलं आहे. 17 जूनला ज्या मागण्या केल्या होत्या. त्याच मागण्या आहेत. त्यात तसूभरही बदल केला नाही. पण सरकारने मागण्या मान्य केल्या नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.