मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणावर टीका केली आहे. महाराष्ट्रात जो पक्ष सत्तेत तोच पक्ष विरोधात अशी विचित्र आणि घाणेरडी परिस्थिती आहे अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. अशी स्थिती जगाच्या पाठीवर केवळ महाराष्ट्रात आहे असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या शिबिरात बोलताना राज ठाकरे यांनी ही टीका केली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
पुढल्या वर्षी मुंबईत आणि कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसंदर्भात आज बैठक आहे. भारत काय इंडिया काय की हिंदुस्तान काय … एकमेव देश आहे की जिथे अशाप्रकारची लोकशाही आहे. महाराष्ट्रात घाणेरडी परिस्थिती झाली आहे. अर्धे पक्ष सत्तेत अर्धा पक्ष बाहेर आले. महाराष्ट्र एकमेव राज्य आहे जिथे सत्तेत आणि विरोधात एकच पक्ष आहे. सत्तेतही शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि विरोधातही शिवसेना राष्ट्रवादी, असे राज ठाकरे म्हणाले.