पत्राचाळ कथित घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. ईडीनं याप्रकरणी मोठी कारवाई केली असून यातील कन्स्ट्रक्शन कंपनीच्या दोन संचालकांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणातील गुरुआशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे नॉर्थ गोव्यातील संचालक राकेश कुमार वाधवान आणि सारंग कुमार वाधवान यांच्या संपत्तीवर ईडीनं टाच आणली आहे. यांच्या ३१.५० कोटी रुपयांच्या इमारती ईडीनं जप्त केल्या आहेत.
दरम्यान, पत्राचाळ कथीत घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना तुरुंगात जावं लागलं होतं, तीन महिने तुरुंगात घालवल्यानंतर सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. संजय राऊत यांचा जामीन अर्ज मंजूर करताना कोर्टानं ईडीच्या कारवाईवर कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ईडीनं संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना तातडीनं अटक केली पण प्रमुख आरोपी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांना अटक का केली नाही? असा सवालही कोर्टानं विचारला होता.
म्हाडाची भूमिका संशयास्पद वाटत असताना म्हाडाच्या कुठल्याही कर्माचाऱ्यावर कारवाई झालेली दिसली नाही, असंही ऑर्डरमध्ये म्हटलं होतं.